योजना आली, पण पाणी नाहीच!
By Admin | Updated: May 12, 2014 06:08 IST2014-05-12T06:08:10+5:302014-05-12T06:08:10+5:30
कर्जत तालुक्यातील पिंपळोली ग्रामपंचायतीमधील अन्थ्राट आणि काळेवाडी या भागात भीषण पाणी टंचाईला तेथील महिलांना सामोरे जावे लागत आहे. तेथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये टिपलोन आली आहे.

योजना आली, पण पाणी नाहीच!
नेरळ : कर्जत तालुक्यातील पिंपळोली ग्रामपंचायतीमधील अन्थ्राट आणि काळेवाडी या भागात भीषण पाणी टंचाईला तेथील महिलांना सामोरे जावे लागत आहे. तेथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये आणि वाडीत टिपलोन आली आहे. पाण्यासाठी तेथील महिलांना कोरड्या पडलेल्या नदीमध्ये डबरे खोदावे लागले आहेत,तर काही ठिकाणी टेकडी उतरून पाणी डोक्यावरून आणावे लागत आहे दरम्यान, नळपाणी योजनेचे पाणी एकदाही पोहोचत नसल्याने आमच्यासाठी नवीन पाणी योजना द्यावी, अशी मागणे येथील ग्रामस्थ करु लागले आहेत. पिंपळोली ग्रामपंचायतीतील नळपाणी योजनेत समाविष्ट केलेल्या अन्थ्राट आणि काळेवाडीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही दोन्ही गावे शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सुगवे आणि सहा गावांच्या नळपाणी योजनेत समाविष्ट आहेत, मात्र अपवाद वगळता अन्थ्राट गावातील विहिरीत फार कमी वेळा नळपाणी योजनेचे पाणी पोहचले आहे. दुसरीकडे काळेवाडीमध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचलेलेच नसल्याने नळपाणी योजनेत आम्ही केवळ नामधारी आहोत, असा आरोप अंंथ्राटचे ग्रामस्थ करीत आहेत . सुगवे नळपाणी योजनेचे मुख्य जलकुंभ अन्थ्राट गावापासून तब्बल दहा किलोमीटर अंतरावर असल्याने भविष्यात या भागात नळपाणी योजनेचे पाणी येण्याची शक्यता फार कमी आहे . सध्या दिडशे घरांची वस्ती असलेल्या अन्थ्राट गावातील महिला कपडे-धुणे, भांडी घासण्यासाठी गावाजवळून वाहणार्या नदीवर जातात ती नदी उन्हाळ्यात कोरडी राहत असल्याने पाण्यासाठी डबरे खोदूून ठेवण्यात आले आहेत, तर पिण्याचे पाणी विकत किंवा स्वत:ची बैलगाडी असल्यास त्यावर पिंप ठेवून ते उल्हासनदीवरून आणावे लागत आहे. उल्हासनदी ते गाव हे अंतर पाच किलोमीटर एवढे आहे. काळेवाडी मधील पन्नास घराचे वस्तीसाठी केवळ एक विहीर आहे. विहीरही वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर खोलगट भागात आहे . तेथे जाण्यासाठी आणि तेथून डोक्यावर पाण्याचे हंडे आणतांना आदिवासी महिलांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. सुगवे नळपाणी योजनेत केवळ नामधारी म्हणून राहण्यापेक्षा आम्हाला वेगळी नळपाणी योजना शासनाने तयार करून द्यावी, अशी मागणी या गावातील कार्यकर्ते गोपाळ डायरे यांनी केली आहे . तर या भागातील कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील घोडविंदे यांनी बोरीवली ग्रामपंचायतीच्या सुगवे पाणी योजनेतून पाणी मिळत नसल्याने ग्रामसभेने अन्थ्राट आणि काळेवाडी मुक्त करावी,अशी सूचना केली आहे. (वार्ताहर)