‘अच्छे दिन’साठी काँग्रेसला सत्तेत आणा - चव्हाण
By Admin | Updated: October 21, 2016 04:26 IST2016-10-21T04:26:41+5:302016-10-21T04:26:41+5:30
सामान्य माणसाला जर खरोखरच ‘अच्छे दिन’ हवे असतील तर काँग्रेसला सत्तेवर आणले पाहिजे, याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे आता उन्हातान्हात काम करून

‘अच्छे दिन’साठी काँग्रेसला सत्तेत आणा - चव्हाण
पनवेल : सामान्य माणसाला जर खरोखरच ‘अच्छे दिन’ हवे असतील तर काँग्रेसला सत्तेवर आणले पाहिजे, याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे आता उन्हातान्हात काम करून पक्ष वाढवा, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी पनवेल येथे पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
पनवेल तालुका काँग्रेस पक्ष व शहर कमिटी कार्यकर्ता मेळावा गुरु वारी पनवेल येथील फडके नाट्यगृहात सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा अध्यक्ष आर.सी.घरत, रमाकांत म्हात्रे, मुश्ताक अंतुले, महिला अध्यक्ष श्रद्धा घरत, रमेश किर व महेंद्र घरत उपस्थित होते. मेळाव्यानंतर तळोजा येथील भाजपा कार्यकर्ते ताहिर पटेल व त्यांचे सहकारी, नेरे विभागातील भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करून सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे संगितले.
चव्हाण म्हणाले, देशाचे भले करण्यासाठी, प्रगतीसाठी जातीय सलोखा महत्त्वाचा असतो. मात्र तो राखण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे. सरकारचा रिमोट कंट्रोल संघाच्या हातात आहे. विद्यमान सरकारमुळे कोणी समाधानी नसल्याचे सांगून केंद्र सरकारच्या विदेश नीतीवरही टीका केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, पक्षाची ताकद वाढवावी, असा सल्ला चव्हाण यांनी दिला. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष सर्व जागा लढवेल, त्यासाठी नव्याने पक्षात आलेल्यांचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. भाई जगताप यांनी आपली तात्त्विक व विचार प्रवृत्तीविरूध्द लढाई असल्याचे सांगून पनवेलचा विकास युतीशिवाय होऊ शकतो हे दाखवून द्या, असे संगितले. माजी मंत्री नजिम खान यांनी भाजपा भारत जोडो पार्टी नसून भारत जलाव पार्टी असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार माणिक जगताप व महेंद्र घरत यांनीही मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
जिल्ह्यात कोणाबरोबर आघाडी करायची याचा निर्णय जिल्हा व तालुका कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल. ज्या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या आहेत, तेथील निर्णय आधी घेतला जाईल. कोकणातील विधान परिषदेच्या जागेसाठी शेकापक्षाने पाठिंबा मागितला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही पाठिंबा द्यावा, असे म्हटले आहे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस