विसर्जनानंतर वाहत आलेल्या मूर्तींचे करतात पुन्हा विसर्जन
By Admin | Updated: September 23, 2015 03:52 IST2015-09-23T03:52:06+5:302015-09-23T03:52:06+5:30
दीड दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत समुद्रात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशी भरती बरोबर समुद्र किनारी वाहत येतात.

विसर्जनानंतर वाहत आलेल्या मूर्तींचे करतात पुन्हा विसर्जन
पंकज राऊत, बोईसर
दीड दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत समुद्रात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशी भरती बरोबर समुद्र किनारी वाहत येतात. त्या सर्व मूर्तींना एकत्र करून खोल समुद्रात जाणाऱ्या बोटीवाल्यांकडे सुपूर्द करून खऱ्या अर्थाने परीपूर्ण विसर्जनाचे काम अनेक वर्षापासून चिंचणी येथील प्रमोद दवणे करीत आहेत.
भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला श्री गणरायाचे घरोघरी गल्लोगल्ली मोठ्या उत्साहात व तेवढ्याच जल्लोषात स्वागत करून गणरायाला आकर्षित मखरामध्ये विराजमान केले जाते. त्याची षोडशोपचार पूजा अर्चा नित्यनेमाने सर्वत्र होते. दिड, पाच, सात, ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतींचे विसर्जन होत असते. गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत निर्विघ्नपणे सर्व कार्य पार पाडल्याच्या समाधानात प्रत्येकजण दैनंदिन कामात व्यस्त होतात. परंतु त्याच वेळी प्रमोद दवणे हे पहाटे चिंचणी ते दांडापाड्यापर्यंत समुद्र किनाऱ्यावर फिरून आदल्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तीपैकी भरतीवाटे किनारी लागलेल्या मूर्ती एकत्र करून खोल समुद्रात जाणाऱ्या बोटीवाल्यांकडे सुपूर्द करतात आणि खऱ्या अर्थाने बाप्पाचे विसर्जन करतात. (वार्ताहर)