प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा
By Admin | Updated: February 16, 2016 02:44 IST2016-02-16T02:44:06+5:302016-02-16T02:44:06+5:30
नैना प्रकल्पबाधितांच्या मागण्या ६ महिन्यांत पूर्ण केल्या नाही तर सिडकोचे काम बंद पाडू, असा इशारा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सिडकोस दिला.

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा
पनवेल : नैना प्रकल्पबाधितांच्या मागण्या ६ महिन्यांत पूर्ण केल्या नाही तर सिडकोचे काम बंद पाडू, असा इशारा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सिडकोस दिला. विविध मागण्यांसाठी खारघर रेल्वे स्थानक ते बेलापूर असा मोर्चा सोमवारी नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीने काढला. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, भीमशक्ती आदी पक्षांनी एकत्रित सिडकोविरोधात हा मोर्चा काढला होता.
या मोर्चाचे नेतृत्व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी केले यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील सर्व गावे ही संभाव्य महापालिकेत समविष्ट करून घ्यावीत, अशी मागणीदेखील करण्यात आली. पनवेल तालुक्यामधील १११ गावांमधील शेतकऱ्यांनी नैना प्रकल्पातील धोरणाला विरोध केला आहे. विरोधासाठी शेतकऱ्यांनी उत्कर्ष समितीची स्थापना केली. नैना प्रकल्पामधील धोरणानुसार एकूण संपादित जमिनीपैकी ६० टक्के जमीन प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून मिळणार आहे. उर्वरित ४० टक्के जमीन सिडको पायाभूत सुविधांसाठी वापरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी ७० टक्के प्रकल्पग्रस्तांना व ३० टक्के सिडकोला जमीन देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सिडकोने २५ एकरांऐवजी ५ एकर जागेला १.७ एफएसआय लागू केला जावा, अशीही मागणी केली आहे.
गावठाण हद्दीत २.५ चा एफएस आय मिळावा, सार्वजनिक जागा, गावाशेजारील शासकीय जागा गावासाठीची मैदाने, सभागृहे, उद्याने अशा कामासाठी आरक्षित असावी, शेतकऱ्यांसाठी डेव्हलपमेंट चार्ज लागू करू नये, ग्रामपंचायतीच्या परवानगीनुसार सध्या अस्तित्वात असणारी बांधकामे अधिकृत करावी, नैना प्रकल्पामध्ये इको-सेन्सेटिव्ह झोनमधील जमिनी समाविष्ठ करण्यात याव्यात, विरार- वसई - अलिबाग १२० मीटर रस्त्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागेसाठी २ चा एफएसआय मिळावा, अशा मागण्या आहेत. यावेळी शेकापचे बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, काशिनाथ पाटील मोर्चात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)