बोईसरला २०० आदिवासी जोडप्यांचे शुभमंगल सावधान
By Admin | Updated: May 26, 2014 04:46 IST2014-05-26T04:46:39+5:302014-05-26T04:46:39+5:30
आधार प्रतिष्ठान व एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू-जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजातील गरीब, गरजू व दारिद्र्यरेषेखालील दोनशे वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा बोईसरला झाला

बोईसरला २०० आदिवासी जोडप्यांचे शुभमंगल सावधान
बोईसर : आधार प्रतिष्ठान व एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू-जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजातील गरीब, गरजू व दारिद्र्यरेषेखालील दोनशे वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा बोईसरला झाला. या सोहळ्यात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी जोडपी सहभागी झाले होते. विवाह सोहळ्याला भाजपाचे नवनिर्वाचित खासदार चिंतामण वनगा,आमदार विष्णू सावरा, माजी आमदार संजय केळकर, शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त अशोक चुरी, आधार प्रतिष्ठानचे सचिव जगदीश धोडी, अध्यक्ष महेंद्र सिंग, उद्योजक महावीर जैन, धनंजय संखे, जितेंद्र अग्रवाल, एपीआय आबासाहेब पाटील, लाला बाजपेई, दीपक भावे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अॅड. चिंतामण वनगा यांनी आदिवासी समाजात आजही दारू शिवाय लग्न होत नाही असे सागून आदिवासींनी आता शिक्षण घेतले पाहिजे, तर नवदाम्पत्यांना कुटुंब दोन मुलांपर्यंतच मर्यादीत ठेवण्याचे आवाहन केले. आमदार सावरा यांनी गोरगरीब आदिवासींना सामुदायिक विवाह सोहळ्याची गरज असते असे सांगून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचेही आवाहन केले. संजय केळकर यांनी जगदीश धोडी हे रचनात्मक काम करीत असल्याचे सांगून संस्कारातून संस्कृतीचे दर्शन घडविले जाते असेही म्हटले. त्यापूर्वी जगदीश धोडींनी आधार प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील कामाची माहिती दिली. आधार प्रतिष्ठानमार्फत वधूला साडी, मेकअप बॉक्स, चप्पल, वरासाठी कुर्ता पायजमा, चप्पल तसेच टॉवेल, चादर आणि संसारोपयोगी भांडी खासदार वनगा व पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले, तर आधार प्रतिष्ठानमार्फत आदिवासी विकास खात्याच्या कन्यादान योजनेमार्फत प्रत्येक जोडप्यांना दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. (वार्ताहर)