पाण्याबरोबरच रक्ताचाही तुटवडा
By Admin | Updated: May 22, 2016 02:14 IST2016-05-22T02:14:15+5:302016-05-22T02:14:15+5:30
सद्या राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पाणीकपात करण्यात आल्याने सर्वत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यातच आत रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

पाण्याबरोबरच रक्ताचाही तुटवडा
अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
सद्या राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पाणीकपात करण्यात आल्याने सर्वत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यातच आत रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.
सुटी असल्याने अनेकजण गावी अथवा पर्यटनासाठी जातात. त्यामुळे महाविद्यायले अथवा सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत नाही. एखाद्या संस्थेने शिबिराचे आयोजन केल तरी फारसा प्रतिसाद मिळन नाही. त्यामुळे सध्या पनवेल आणि नवी मुंबई परिसरात रक्तपेढ्या तसेच रुग्णालयांमध्ये रक्ताची कमतरता भासत असून अपेक्षित रक्तगट मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांमधून करण्यात येत आहे.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात अनेक दवाखाने असून या ठिकाणी उपचाराची सोय सुविधा आहेत. तेरणा, एमजीएम. डी वाय पाटील, टाटा मेमेरीयल ट्रस्टचे मोठे रुग्णालय असून या ठिकाणी राज्यभरातून रूग्ण उपचाराकरीता येतात. नवी मुंबईतील वाशी, नेरूळ, सानपाडा, बेलापूर आणि पनवेल पट्टयात नवीन पनवेल, पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे या ठिकाणी अनेक लहान मोठे रूग्णालय असून येथे रायगड जिल्ह्यासह कोकणातून लोक उपचाराकरीता येतात. किडणी, हृदयरोग यासारख्या विविध आजारांच्या रूग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. त्याचबरोबर शस्त्रक्रिया करतानाही रक्ताची गरज भासते. याशिवाय मलेरिया, डेंग्यु यासारख्या आजार झाले तरी शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात, तेव्हा त्या द्याव्या लागतात.
नवी मुंबई, पनवेल परिसरात महिन्याला किमान तीन हजारांपेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्याची मागणी असते. जून ते जानेवारी दरम्यान महाविद्यालय त्याचबरोबर इतर सेवाभावी संस्थांकडून विविध ठिकाणी रक्तदान शिबिर होत असल्याने त्या ठिकाणाहून सहज रक्त उपलब्ध होते.
सद्या उन्हाळा असल्याने रक्त साठा कमी झाला आहे. खांदा वसाहतीतील रोटरी क्लब आॅफ नवीन पनवेल चॅँरीटेबल ट्रस्ट संचलीत डाँक्टर बी व्ही लिमये रक्तपेढीत रक्ताची टंचाई जाणवू लागली आहे. त्यांच्याकडे आजच्या घडीला केवळ २५ रक्त पिशव्या आहेत. मागणी त्यापेक्षा किती तरी जास्त आहे.
नवी मुंबईतील तेरणा ब्लड बॅकेत इतरवेळी १०० हून अधिक रक्तपिशव्यांचा साठा असतो. मात्र याठिकाणीही रक्ताचा तुटवडा जाणवत असून केवळ २५ पिशव्या रक्त उपलब्ध आहे. तशीच परिस्थिती पनवेल येथील साई ब्लड बँकेची आहे. या ठिकाणी काही रक्तगटातील रक्त शिल्लक नाही. विशेषत: एबी पॉझिटिव्हचा मोठया प्रमाणात तुटवडा भासत
आहे.
एमजीएम, लाईफलाईन व खारघर येथील नवी मुंबई ब्लड बँकेची परिस्थिती फारशी वेगळी नाही. किडणीचा विकार झालेल्या रूग्णांना डायलिसिस केले जाते त्यांना सातत्याने रक्ताची गरज भासतो. मात्र सध्या रक्त मिळत नसल्याने अशा रुग्णांना इरीथ्रोपोयटीन व आयर्न हे इंजेक्शन दयावी लागत असल्याचे डायलिसेस तंत्रज्ञ मनोज राणे यांनी सांगितले. जून महिन्यापर्यंत ही टंचाई राहणार असून पावसाळयात रक्तसाठा वाढेल, असा विश्वास असे लियमे रक्तपेढीचे सुरेश श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.