रिक्षाचालकांना करून देणार कर्तव्याची जाणीव

By Admin | Updated: September 22, 2015 03:40 IST2015-09-22T03:40:22+5:302015-09-22T03:40:22+5:30

प्रवाशांना चांगली सेवा देणे, हे प्रथम कर्तव्य असतानादेखील बहुतेक रिक्षाचालक त्याला हरताळ फासून ठाणेकर प्रवाशांची लूट करीत आहेत.

Rickshaw drivers are aware of the duty to do | रिक्षाचालकांना करून देणार कर्तव्याची जाणीव

रिक्षाचालकांना करून देणार कर्तव्याची जाणीव

अजित मांडके, ठाणे
प्रवाशांना चांगली सेवा देणे, हे प्रथम कर्तव्य असतानादेखील बहुतेक रिक्षाचालक त्याला हरताळ फासून ठाणेकर प्रवाशांची लूट करीत आहेत. त्यामुळे या रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी लोकमतने उचललेल्या एका पावलासोबत आता ठाणेकर प्रवाशांचे असंख्य पावले जोडली जाऊ लागली आहेत. अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून त्यांना रिक्षाचालकांबरोबर आलेले अनुभव शेअर केले आहेत. त्यामुळे आता विनाकारण हॉर्न वाजविणे बंद कर, या मोहिमेनंतर ‘रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून दे’, या लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या चळवळीला आणखी यश येऊ लागले आहे.
‘काहीतरी कर ठाणेकर’ चळवळीला आता चांगलेच यश लाभण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी लोकमतच्या मोहिमेचे कौतुक केले असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी लोकमतने दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या नंबरवर अनेकांनी मेसेज टाकून त्यांना रिक्षाचालकांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा अनुभव शेअर केला आहे. तसेच त्यांना कशा पद्धतीने रिक्षाचालकांनी लुबाडले, भाडे कसे नाकारले, याचेही अनुभव कथन केले आहेत. तसेच काही रिक्षाचालकांनीही या नंबरवर फोन करून त्यांच्या व्यथाही मांडल्या आहेत. त्यामुळे आता घोडबंदर येथील एका गृहस्थाने त्यांना आलेला अनुभव शेअर करताना सांगितले की, मानपाड्याला रिक्षाने आलो असता, त्याला शंकर मंदिराकडे जाण्यास विनंती केली असता, त्याने जाण्यास नकार दिला. उलट, त्या ठिकाणी लांबून जावे लागेल, असे सांगून त्याने नकार दिला. त्याला शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अरेरावी सुरू
केली. ठाणे स्टेशन ते हरिनिवास सर्कलपर्यंत रिक्षाचालकाला सांगितले असता, त्याने रिक्षा रिकामी असतानाही येण्यास नकार दिल्याचे राजेश शिरोडकर यांनी सांगितले.
रात्री ८ नंतर गावदेवी येथील एका रिक्षाचालकाला ओवळा येथे मीटरने येणार का, असे विचारले असता, त्याने थेट २०० रुपये होतील, असे सांगितले. मात्र, मीटरने येण्यास नकार दिल्याची माहिती दीपक जाधव यांनी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर शेअर केली आहे. अशा प्रकारे भाडे नाकारणे, जवळच्या ठिकाणी येण्यास नकार देणे, सायंकाळच्या वेळेस रिक्षा रिकाम्या असतानाही सीएनजी भरायचे असल्याचे कारण देत रिक्षाचालक येण्यास नकार देतात.
काहींनी रिक्षाचालकांचे चांगले अनुभवही सांगितले आहेत. यात जवळचे अंतर असले तरी काहीही काचकूच न करता काही चालकांनी येण्यास तयारी दर्शविल्याचेही अनुभव प्रवाशांनी कथन केले आहेत.

Web Title: Rickshaw drivers are aware of the duty to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.