चर्चेबाबत पालिका सदस्य उदासीन
By Admin | Updated: February 23, 2016 02:26 IST2016-02-23T02:26:36+5:302016-02-23T02:26:36+5:30
आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलाविण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बहुतांशी नगरसेवकांची उदासीनता दिसून आली. अर्थसंकल्पाचा
चर्चेबाबत पालिका सदस्य उदासीन
नवी मुंबई : आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलाविण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बहुतांशी नगरसेवकांची उदासीनता दिसून आली. अर्थसंकल्पाचा कोणताही अभ्यास न करता आलेल्या बहुतांशी सदस्यांनी गप्प राहणे पसंत केले. काहींचा अपवाद सोडता ज्येष्ठ सदस्यांनी चर्चेत सहभाग न घेतल्याने आजच्या दिवसात अर्थसंकल्पावर कोणतीही सकारात्मक चर्चा होवू शकली नाही.
भाजपाचे नगरसेवक रामचंद्र घरत यांनी नागरी सुविधांच्या खर्चात वाढ करावी याकरिता अंदाजपत्रकात १०० ते २०० कोटी रुपयांची वाढ सुचविली. महानगरपालिका क्षेत्रात परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना शहराची ओळख करुन देण्याकरिता पर्यटन विकासावर भर दिला जावा तसेच त्यादृष्टीने विकास करून रेव्हेन्यू वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही घरत यांनी यावेळी सूचित केले. नगरसेविका कोमल वास्कर यांनी जमा-खर्चाची बाजू समतोल राखणारा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला जात आहे.
महागाईमुळे विधवा महिलेच्या मुलींच्या लग्नाकरिता देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करणे आवश्यक असल्याचे मतही वास्कर यांनी मांडले. नगरसेविका अॅड. अपर्णा गवते यांनी विरंगुळा केंद्राच्या खर्चात वाढ करुन जास्तीत जास्त सेवा-सुविधा पुरवाव्यात तसेच ऐरोली आणि बेलापूर विधासभेत दोन वृध्दाश्रम बांधले जाऊन या खर्चात वाढ करावी असे सुचविले. त्याचबरोबर अंगणवाडी विकास योजना, सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर द्यावी, क्षयरोग हिवताप निर्मूलन याकडे अधिक लक्ष केंद्रित केले जावे. नगरसेवकाच्या मानधनात वाढ केली जावी अशीही मागणी गवते यांनी यावेळी केली. कोणतीही करवाढ नसलेला २१ वर्षांतील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याची स्तुती शिवराम पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)