शुल्कवसुलीसाठी विद्यार्थ्यांना परिक्षेपासून रोखले
By Admin | Updated: October 16, 2016 03:43 IST2016-10-16T03:43:17+5:302016-10-16T03:43:17+5:30
थकित शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू न दिल्याचा प्रकार घणसोलीतील ए.एस.पी शाळेत घडला. यावेळी जाब विचारायला गेलेल्या पालकांना शाळा

शुल्कवसुलीसाठी विद्यार्थ्यांना परिक्षेपासून रोखले
नवी मुंबई : थकित शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू न दिल्याचा प्रकार घणसोलीतील ए.एस.पी शाळेत घडला. यावेळी जाब विचारायला गेलेल्या पालकांना शाळा व्यवस्थापनाकडून अरेरावी झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अखेर मनसेच्या शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनाला धारेवर धरत घडलेल्या प्रकाराची तक्रार शिक्षण विभागाकडे केली.
घणसोली सेक्टर ९ येथील ए.एस.पी शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रातील मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसोबत शुक्रवारी हा प्रकार घडला. शुल्क बाकी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळा व्यवस्थापनाने काही दिवसांपूर्वी तात्काळ शुल्क भरण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतरही काही पालक शुल्क भरु शकले नव्हते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरणा झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने सुरु असलेल्या सहामाही परिक्षेला बसण्यास मनाई केली होती. शुक्रवारी सकाळी काही विद्यार्थी परिक्षेसाठी गेले असता त्यांना परीक्षा केंद्रात जाण्यापासून अडविले. हा प्रकार कळताच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली असता, व्यवस्थापन कर्मचाऱ्यांकडून त्यांना अपमानीत करण्यात आले. त्यामुळे संतप्त पालक शाळेच्या आवारात जमल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी पालकांसह शाळा व्यवस्थापनाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे गलुगडे यांनी सांगितले. या प्रकरणाची तक्रार शिक्षण मंडळाचे केंद्रीय समन्वयक संदीप संघवी यांच्याकडे करुन कारवाईची मागणी केल्याचे संदीप गलुगडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शनिवारी आरपीआय युवक आघाडीचे ठाणे लोकसभा युवक अध्यक्ष यशपाल ओहोळ यांनी कार्यकर्त्यांसह शाळेवर धडक दिली. यावेळी मनसे शहर सचिव संदिप गलुगडे हे देखिल सोबत होते. परंतु पालकांसोबत आलेला जमाव पाहताच शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांची भेट घेण्याचे टाळले. त्यामुळे घडलेल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आलेल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक तास ताटकळत बसावे लागले. अखेर त्यांच्याकडून शाळा व्यवस्थापनाप्रती संताप व्यक्त होताच संस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी त्यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाईचे आश्वासन दिले.