स्मार्ट सिटीच्या श्रेयावरून राजकारण

By Admin | Updated: September 30, 2015 00:22 IST2015-09-30T00:22:06+5:302015-09-30T00:22:06+5:30

स्मार्ट सिटी योजनेमध्ये नवी मुंबईच्या सहभागावरून आमदार मंदा म्हात्रे व महापौर सुधाकर सोनावणे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

Politics from Smart City's Character | स्मार्ट सिटीच्या श्रेयावरून राजकारण

स्मार्ट सिटीच्या श्रेयावरून राजकारण

नवी मुंबई : स्मार्ट सिटी योजनेमध्ये नवी मुंबईच्या सहभागावरून आमदार मंदा म्हात्रे व महापौर सुधाकर सोनावणे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्यामुळेच या योजनेत नवी मुंबईचा समावेश झाल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले. महापौरांनी गुणवत्तेवर व वीस वर्षांतील विकासकामांमुळेच हा बहुमान मिळाल्याचे स्पष्ट केले यामुळे व्यासपीठावरच आमदारांनी त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
भारत सरकारच्या स्मार्ट सिटी व इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये चर्चासत्राचे आयोजन केले होते. नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. पण नागरिकांपेक्षा नेत्यांनीच जास्त भाषणबाजी केली. आमदार मंदा म्हात्रे यांनी स्मार्ट सिटीमध्ये नवी मुंबईचा समावेश होत नव्हता. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. नवी मुंबईचा या योजनेमध्ये समावेश झाला पाहिजे असे त्यांना सांगितल्यानंतरच आपल्या शहराचा समावेश झाल्याचे स्पष्ट केले. या योजनेत सहभाग झाला परंतु विकास करण्यासाठी पैशांची गरज असते. पैशांचे सोंग करता येत नाही. एलबीटी रद्द झाला आहे. शासनाकडून महिन्याला ५० कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात ११ कोटी रुपये मिळाले आहेत. पैशांची अडचण दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग घेवू या. पैसे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.
महापौर सुधाकर सोनावणे यांनी आमदारांच्या भाषणाचा समाचार घेतला. स्मार्ट सिटीमध्ये नवी मुंबईचा सहभाग वशिलेबाजीवर नाही तर गुणवत्तेच्या बळावर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्र्षांत शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. पालिकेकडे स्वत:च्या मालकीचे धरण आहे. अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र ,डंपिंग ग्राऊंड, चांगले रस्ते यामुळे स्मार्ट सिटीमध्ये सहभाग झाला असल्याची कोपरखळी आमदारांना मारली. महापौरांनीही राजकीय भाषण सुरू केल्यानंतर समोरील नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली.
----------
व्यासपीठावरच नाराजी
महापौर सुधाकर सोनावणे यांनी भाषणात आमदार मंदा म्हात्रेंच्या भाषणाचा समाचार घेतल्यानंतर म्हात्रे यांनी व्यासपीठावरच नाराजी व्यक्त केली. महापौरांना धारेवर धरण्यास सुरवात केली. तुम्ही वीस वर्षांत काय केले असा प्रश्न उपस्थित केला. व्यासपीठावर सुरू असलेल्या नाराजीनाट्यामुळे उपस्थितांची मात्र चांगलीच करमणूक झाली.
नागरिक नाराज
चर्चासत्रासाठी शहरातील अनेक दक्ष नागरिक उपस्थित होते. आमदार मंदा म्हात्रे व महापौर सुधाकर सोनावणे यांच्या राजकीय भाषणांविषयी सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळीही म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती. वारंवार अशा घटनांमुळे पदाधिकाऱ्यांवरचा आदर कमी होतो अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Web Title: Politics from Smart City's Character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.