राजकीय भूकंप घडविणारे वर्ष

By Admin | Updated: December 28, 2015 02:58 IST2015-12-28T02:58:34+5:302015-12-28T02:58:34+5:30

शहरातील सर्वच राजकीय पक्षांना मावळत्या वर्षामध्ये फुटीचे ग्रहण लागले. बंडखोरीमुळे शिवसेना व भाजपाचे महापालिकेची सत्ता मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

Political earthquake year | राजकीय भूकंप घडविणारे वर्ष

राजकीय भूकंप घडविणारे वर्ष

नवी मुंबई : शहरातील सर्वच राजकीय पक्षांना मावळत्या वर्षामध्ये फुटीचे ग्रहण लागले. बंडखोरीमुळे शिवसेना व भाजपाचे महापालिकेची सत्ता मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अनेक दिग्गज नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळविला आले नाही. काँगे्रस व अपक्षांच्या साथीने सत्ता मिळवावी लागली. वर्षाच्या सुरुवातीला पक्षात फूट सुरू झाली ती वर्षअखेरीसही कायम राहिली.
नवी मुंबईमधील २०१४ या वर्षाची सुरुवातच राजकीय अस्थिरतेने झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर डिसेंबरमध्ये राष्ट्रवादीने वाशीमध्ये मेळावा घेतला व राष्ट्रवादीला सोडून भाजपामध्ये जाण्याचा सूर आळवला. यामुळे शहरातील राजकारणामध्ये भूकंप झाला. कार्यकर्ते बोलले असले तरी स्वत: गणेश नाईक व परिवारातील इतर सदस्यांनी मात्र मौन बाळगले होते. कधी ते भाजपात जाणार तर कधी शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे भाजपा व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी व काँगे्रसमधून फुटून इतर पक्षात जाणाऱ्या नगरसेवकांनाही त्यांचा निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता. अखेर पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाईकांनी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर शिवराम पाटील, अनिता पाटील, एम. के. मढवी, विनया मढवी, किशोर पाटकर, नारायण पाटील, जिल्हा अध्यक्षा व माजी नगरसेविका कमलताई पाटील, शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत पाटील यांनी शिवसेनेत व संपत शेवाळे यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. काँगे्रसमधील नामदेव भगत, इंदुमती भगत, विलास भोईर, रंगनाथ औटी, रामाशेठ वाघमारे, सिंधू नाईक, अरविंद नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने निवडणुकीअगोदरच पक्षाची अवस्था केविलवाणी झाली होती.
विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघात धक्कादायक विजय मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महापालिका निवडणुकीमध्ये मात्र फारसा प्रभाव पाडता आला नाही. फक्त पाचच उमेदवार निवडून आले. ऐरोली मतदारसंघामध्ये विधानसभेला ४० हजारांपेक्षा जास्त मते मिळविणारे वैभव नाईक महापालिका निवडणुकीपासून राजकारणापासून थोडे अलिप्तच झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. अनेक कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. आरपीआय, शेतकरी कामगार पक्षाच्या वाट्यालाही अपयशच आहे. राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे त्यांना सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेस व अपक्षांची मदत घ्यावी लागली. प्रभाग समित्यांच्या केलेल्या रचनेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. स्मार्ट सिटीवरूनही सत्ताधारी व विरोधकांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.
राष्ट्रवादीच्या एक नगरसेविकेचे निधन झाले तर तीन एक ठिकाणी जातीचा दाखलाच बनावट असल्याचे निदर्शनास आले. वर्षअखेरीस दिघामधील गवते कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची व पालकमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीही सेनेत जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
>> वर्षभरातील प्रमुख राजकीय घडामोडी
३ जानेवारी : काँगे्रसने नवी मुंबई मनपा निवडणुकीची जबाबदारी नारायण राणेंवर सोपविली
५ फेब्रुवारी : मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी अडीच एफएसआयची घोषणा
७ फेब्रुवारी : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर
१६ फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवराम पाटील व अनिता पाटील, काँगे्रसचे रामाशेठ वाघमारे, रंगनाथ औटी, किलास भोईर यांचा शिवसेनेत प्रवेश.
२० फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे वाशीतील नगरसेवक किशोर पाटकर यांचाही शिवसेनेत प्रवेश
२३ फेब्रुवारी : गणेश नाईक यांची राष्ट्रवादीतच राहणार असल्याची घोषणा, अडीच महिन्यांनंतर मौन सोडले
४ मार्च : कट्टर गणेश नाईक समर्थक एम. के. मढवी व विनया मढवी यांचा आमदारांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करून शिवसेनेत प्रवेश
७ मार्च : पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला
७ मार्च : राष्ट्रवादीचे नगरसेवक नारायण पाटील शिवसेनेत
१९ मार्च : संपत शेवाळे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
४ एप्रिल : नगरसेवक मधुकर मुकादम यांचा शिवसेनेत प्रवेश
१३ एप्रिल : भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे व वर्षा भोसले यांच्यात वाद; पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
२२ एप्रिल : महापालिकेसाठी मतदान
२३ एप्रिल : निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला ५, शिवसेनेला ३६, भाजपाला ६, अपक्ष उमेदवारांचा ५ ठिकाणी विजय
९ मे : अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांची महापौरपदी निवड
२४ आॅगस्ट : प्रभाग समितीच्या रचनांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती
११ सप्टेंबर : मंदा म्हात्रे यांनी गणेशदर्शन स्पर्धेत बोलू न दिल्याने पालिकेवर हक्कभंगाचा इशारा दिला
२ आॅक्टोंबर : नगरसेविका शशिकला मालादी यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे उघड
१५ आॅक्टोबर : दिघ्यातील बांधकाम वाचविण्यासाठी राष्ट्रवादी नगरसेवकांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट
८ डिसेंबर : स्मार्ट सिटीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने फेटाळला
११ डिसेंबर : स्मार्ट सिटीविषयी महासभेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची स्थगिती
११ डिसेंबर : नगरसेवक नवीन गवते व अपर्णा गवते यांनी दिघामधील घरांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Web Title: Political earthquake year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.