पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: October 26, 2015 01:04 IST2015-10-26T01:04:54+5:302015-10-26T01:04:54+5:30
गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत सातत्याने पाणीटंचाईची भेडसावत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त
कळंबोली : गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत सातत्याने पाणीटंचाईची भेडसावत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. कळंबोली वसाहतीची लोकसंख्या ही दोन लाखांच्या आसपास पोहचली असून वसाहतीला ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सिडकोकडे नवीन पनवेल व कळंबोली नोडला पाणीपुरवठा करण्याकरिता कोणतीच सोय नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेवून ते रहिवाशांना पुरवले जाते. एमजेपी पाताळगंगा नदीतून पाणी उचलून ते भोकरपाडा येथे शुध्द करते आणि त्या ठिकाणाहून जलवाहिन्यांव्दारे सिडको, पनवेल नगरपालिका आणि जेएनपीटीला पाणी दिले जाते. मात्र या वाहिन्या अतिशय जुनाट झाल्या असल्याने त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे जवळपास २५ टक्के पाण्याची गळती होत आहे.
वाहिन्या दुरूस्त करण्याकरिता वारंवार शटडाऊन घेतला जातो. त्यामुळे सिडको वसाहतींना पाणी टंचाईला वारंवार सामोरे जावे लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून २० ते २२ एमएलडी पेक्षा जास्त पाणी कळंबोलीला मिळत नाही. त्यामुळे या वसाहतीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रहिवासी सिडको कार्यालयावर मोर्चे घेऊन येतात. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका प्रमुख वासुदेव घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी धडक दिली. यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पाण्याचा अपव्यय कमी करून बाहेर जाणारे टँकर बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)