फीवाढीविरोधात पालकांचे आंदोलन
By Admin | Updated: February 24, 2016 03:12 IST2016-02-24T03:12:11+5:302016-02-24T03:12:11+5:30
विश्वासात न घेता शुल्कवाढ केल्याच्या निषेधार्थ कोपरखैरणेतील क्राईस्ट अॅकॅडमी शाळेवर पालकांनी मोर्चा काढला होता. विविध कारणे सांगून शाळेकडून वारंवार आर्थिक

फीवाढीविरोधात पालकांचे आंदोलन
नवी मुंबई : विश्वासात न घेता शुल्कवाढ केल्याच्या निषेधार्थ कोपरखैरणेतील क्राईस्ट अॅकॅडमी शाळेवर पालकांनी मोर्चा काढला होता. विविध कारणे सांगून शाळेकडून वारंवार आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला. तर पालक शिक्षक समितीच्या (पीटीए) मंजुरीने शुल्कवाढ केल्याचे सांगत शाळा व्यवस्थापनाने आंदोलक पालकांना धुडकारून लावले.
कोपरखैरणे येथील क्राईस्ट अॅकॅडमीने विद्यार्थ्यांच्या वार्षिक शुल्कामध्ये यंदाच्या वर्षीपासून वाढ केली आहे. स्टेट बोर्डासाठी २३ टक्के तर आयसीसी बोर्डासाठी २६ टक्के अशी ही शुल्कवाढ आहे. मात्र ही शुल्कवाढ झाल्याचे पत्र पालकांच्या हाती मिळताच त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. मंगळवारी सकाळी सुमारे दीडशे पालकांनी शाळेला घेराव घातला. शाळा व्यवस्थापनाकडून सतत विविध कारणे सांगून पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप उपस्थित पालकांनी केला. यापूर्वी शाळा इमारत दुरुस्ती निधीच्या नावाखाली १ ते ३ वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरणा करण्याचे पालकांना सूचित करण्यात आले होते.
शाळेत शिक्षण घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे सर्वसामान्य घरातील, रिक्षा चालक व अल्प उत्पन्न घटकातील आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या पालकांना वगळता इतरांनी एकाच वेळी दीड ते दोन लाख रुपये शुल्क स्वरूपात शाळेत जमा केलेले आहे. त्यामुळे इतर पालकांवर फीवाढीचे ओझे लादले जात असल्याचाही आरोप पालक शेखर पाटील यांनी केला आहे.
शाळेच्या कार्यक्रमांसाठी देखील पालकांकडून ३ ते ५ हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. तसेच विद्यार्थी त्याच ठिकाणी शिकत असतानाही प्रत्येक तीन वर्षांनी पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवून जादा १० हजार रुपये घेतले जातात. बहुतांश पालक चेकद्वारे विद्यार्थ्यांचे शुल्क शाळेत जमा करतात. मात्र शाळा व्यवस्थापनाच्या गलथानपणामुळे हे धनादेश तीन ते चार महिन्यांनी वटवण्यासाठी जमा होत असून त्यावर लागणारा दंड देखील पालकांकडून उकळला जात असल्याचा आरोप पालक सुनील पार्टे यांनी केला आहे. अखेर शाळा व्यवस्थापनाच्या मनमानीविरोधात पालकांनी ठिय्या मांडला. यावेळी शाळा व्यवस्थापनाने दोन पालकांना चर्चेसाठी बोलावून शुल्कवाढीचा निर्णय पीटीएच्या मान्यतेने झाल्याचे सांगितले. तसेच पीटीए कमिटीची स्वाक्षरी असलेले पत्रही दाखवले. यामुळे पीटीए कमिटी व पालकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)