अग्निशमन दल उघड्यावर
By Admin | Updated: February 24, 2016 03:12 IST2016-02-24T03:12:53+5:302016-02-24T03:12:53+5:30
आपत्काळात नागरिकांच्या मदतीला धावणारे वाशीचे अग्निशमन दलच उघड्यावर पडले आहे. जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवी इमारत उभारणीचे काम

अग्निशमन दल उघड्यावर
नवी मुंबई : आपत्काळात नागरिकांच्या मदतीला धावणारे वाशीचे अग्निशमन दलच उघड्यावर पडले आहे. जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवी इमारत उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनांसह कर्मचाऱ्यांची पर्यायी ठोस व्यवस्था होणे गरजेचे असतानाही केलेल्या पर्यायी सोयीमुळे कर्मचाऱ्यांची असुविधा होत आहे.
महापालिका क्षेत्रात लागलेली आग विझवण्यास अनेक आपत्ती प्रसंगी अग्निशमन दलाने केलेले कार्य मोलाचे ठरत आहे. औद्योगिक क्षेत्राचे देखील स्वतंत्र अग्निशमन दल असतानाही त्याठिकाणच्या दुर्घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका महापालिकेच्याच अग्निशमन दलाला घ्यावी लागत आहे. महापालिकेच्या या महत्त्वाच्या अग्निशमन यंत्रणेचे वाशी येथे मुख्य केंद्र आहे. परंतु सध्या हेच अग्निशमन दलाचे केंद्र उघड्यावर पडले आहे. वाशी, ऐरोली व सीबीडी येथील अग्निशमन दलाच्या सिडकोकालीन इमारती जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून त्याठिकाणी राहावे लागत होते. अखेर सीबीडीपाठोपाठ वाशीच्या जुन्या इमारतीचे पुनर्बांधकाम पालिकेने हाती घेतले आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या इमारत बांधकामाला सुरवात झाली आहे. यामुळे त्याच जागेवर विरुध्द दिशेला अग्निशमन दलाची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत कामगारांना नेरुळ किंवा इतर पर्यायी ठिकाणच्या इमारतींमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. यामध्ये कार्यालय मात्र पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. ज्याठिकाणी अग्निशमन दलाची वाहने उभी केली जात आहेत त्याठिकाणी सुरक्षा भिंतच नाही. यामुळे समोरच्या मार्गाने जाणारे कोणतेही वाहन थेट अग्निशमन दलाच्या जागेत प्रवेश करू शकते. याचाच गैरफायदा समाजकंटकांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पर्यायी सोय करतेवेळी त्याठिकाणची पूर्वीची भिंत पाडल्यानंतर पुन्हा ती बांधून फाटकही उभारलेले नाही. यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना वाहनांच्या सुरक्षेसाठी वाहनांसमोर बसून रात्र जागवावी लागत आहे. अग्निशमन दलात कोट्यवधी रुपये किमतीची वाहने असून नुकतेच एक नवे रेस्क्यू आॅपरेशन वाहन देखील सेवेत दाखल झाले आहे. ही सर्व वाहने त्याच ठिकाणी उभी असतात. कर्मचाऱ्यांसाठी बनवलेल्या तात्पुरत्या कार्यालयात पिण्याच्या पाण्यापासून ते इतर अनेक गैरसोयी होत आहेत. परंतु न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
वाशी अग्निशमन दलासाठी नवी इमारत उभारण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी आहे. या दरम्यान त्याच भूखंडाच्या मोकळ्या जागेत अग्निशमनची पर्यायी सोय केलेली आहे. तर कर्मचाऱ्यांसाठी नेरुळ व इतर उपलब्ध जागेत सोय केली जाणार आहे. सात ते आठ महिन्यांत कामाच्या पहिल्या टप्प्यात एक इमारत पूर्ण करून त्यामध्ये कार्यालयाची सोय केली जाईल. परिस्थितीची पाहणी करून लवकरच सुरक्षा भिंतही बांधली जाईल.
- मोहन डगावकर, शहर अभियंता.