किरकोळ वादातून एकाची हत्या
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:06+5:302016-03-16T08:36:06+5:30
किरकोळ वादातून एका सहकाऱ्याची हत्या करणाऱ्या दोघा सुरक्षारक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. मालकाला चुगली करत असल्याच्या संशयावरून मद्यधुंद अवस्थेत

किरकोळ वादातून एकाची हत्या
नवी मुंबई : किरकोळ वादातून एका सहकाऱ्याची हत्या करणाऱ्या दोघा सुरक्षारक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. मालकाला चुगली करत असल्याच्या संशयावरून मद्यधुंद अवस्थेत त्यांच्यात वाद सुरू होता. या प्रकारात जबर मारहाण झाल्याने एकाचा मृत्यू झाला.
सोमवारी मध्यरात्री वाशीतील महात्मा गांधी कॉम्प्लेक्सलगत हा प्रकार घडला. तिघांमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बिट मार्शल शाबीर तडवी व अनिल पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अमोल समुद्रे हे जखमी अवस्थेत आढळले. परंतु पोलीस येण्याअगोदरच मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. काही अंतरावरच प्रत्यक्षदर्शीअशोक कनोजिया उपस्थित होते. त्यांनी मारेकरी पळालेल्या दिशेची माहिती देताच, बिट मार्शल पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले. दरम्यान, उपनिरीक्षक विजय कोळेकर यांनी जखमी अमोल समुद्रे यांना उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानुसार समुद्रे यांच्या हत्येप्रकरणी विजय गायकवाड व विकास बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.
समुद्रे व त्यांचे मारेकरी हे तिघेही बांधकाम व्यावसायिक सुरेश बिजलानीच्या बंगल्याचे सुरक्षारक्षक आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्यात कामावर उशिरा येण्यावरून वाद सुरू होता. समुद्रे हे मालकाला चुगली करत असल्याचा संशय गायकवाड व बिरादार यांना होता. यावरून सोमवारी त्यांच्यात हाणामारी झाली.