करवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्रक
By Admin | Updated: May 31, 2014 01:14 IST2014-05-31T01:14:27+5:302014-05-31T01:14:27+5:30
स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी शुक्रवारच्या महासभेत महापौर कल्याणी पाटील यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले

करवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्रक
कल्याण : कोणतीही करवाढ नसलेले अन् कल्याण-डोंबिवली महापालिकेचे २०१४-१५ चे १५५३ कोटी ६१ लाख रुपये जमेचे आणि १५५३ कोटी ४० लाख रुपये खर्चाचे २१ लाख ५१ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी शुक्रवारच्या महासभेत महापौर कल्याणी पाटील यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले. यात उत्पन्नवाढीसाठी मोठमोठे अंदाज वर्तविले असले तरी प्रत्यक्षात हे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाची कसोटी लागणार आहे. एलपीजी स्मशानभूमी, प्रवेशद्वारावर स्वागत कमानींसह शहरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे बांधण्यासह खवय्यांसाठी फिश मार्केट बांधण्याचे गाजर अंदाजपत्रकात दाखविले आहे़ अंदाजपत्रकावर निर्णय घेण्यासाठी उद्या शनिवारी महासभा बोलाविली आहे. २०१३-१४ चे सुधारित व सन २०१४-१५ चे मूळ अंदाजपत्रक महासभेला सादर करण्यात आले. सभागृहाच्या परवानगीने माजी सभापती प्रकाश पेणकर यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. उत्पन्नाच्या बाबीचा विचार करता स्थानिक संस्था करातून (एलबीटी) २७१ कोटी १३ लाख, मालमत्ता करातून २७५ कोटी, पाणीपट्टीमधून ८२ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, हा अंदाज मांडताना व्यापार्यांची नोंदणी न होणे, मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असणे, गेल्या दोन वर्षांत पाणी बिलांची वसुली न होणे, याकडेही लक्ष वेधले आहे. त्यामुळे वास्तव पाहता उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट प्रशासन कितपत गाठेल, याबाबत साशंकता आहे. रस्ते विकासासाठी १४७ कोटी, पाणीपुरवठा २१ कोटी १२ लाख, भुयारी गटार आणि मलनि:सारणाची कामे २३ कोटी ५६ लाख, रस्त्यांवरील दिवाबत्ती ७ कोटी ३७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यंदा प्रभागातील विकासकामांसाठी प्रत्येकी ५१ लाखांचा निधी देण्यात आला असून पदाधिकार्यांसाठी २० लाखांचा स्वतंत्र निधी देणार आहे. याचबरोबर उद्याने व तलाव सुशोभीकरणासाठी १३ कोटी ६२ लाख, खेळाची मैदाने आणि क्रीडांगणे ४ कोटी ४० लाख, मंडई उभारणे ६ कोटी, रुग्णालये व दवाखाने सेवा ५ कोटी ९१ लाखांची तरतूद यंदा केली आहे. प्रशासन नेहमीच सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप परिवहन उपक्रमाकडून केला जातो़ या वेळी त्यांना १० कोटी ७५ लाखांचा निधी दिला आहे. (प्रतिनिधी)