नायजेरियनचा उपद्रव वाढला
By Admin | Updated: September 20, 2015 00:07 IST2015-09-20T00:07:42+5:302015-09-20T00:07:42+5:30
शहरात नायजेरियन नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: गाव गावठाणातील बेकायदा घरांतून टोळ्या टोळ्यांनी राहणाऱ्या या नायजेरियन नागरिकांच्या

नायजेरियनचा उपद्रव वाढला
नवी मुंबई : शहरात नायजेरियन नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: गाव गावठाणातील बेकायदा घरांतून टोळ्या टोळ्यांनी राहणाऱ्या या नायजेरियन नागरिकांच्या कारवाय्यांमुळे रहिवासी हैराण झाले आहेत. घणसोली, कोपरखैरणे, बोनकोडे तसेच जुहूगावात नायजेरियन नागरिकांचे मोठ्याप्रमाणात वास्तव्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
विविध गुन्हेगारी कारवाय्यांत नायजेरियन नागरिकांचा सहभाग असल्याचे अनेक प्रकरणांतून यापूर्वी उघड झाले आहे. सायबर सिटीत तर या नायजेरियन नागरिकांनी उच्छाद मांडल्याचे दिसून आले आहे. गाव गावठाणात गरजेपीटीच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतीतील भाडेतत्वावरील घरातून हे नायजेरियन वास्तव्य करीत आहेत. एका घरात चार ते पाच जण राहत असल्याने त्यांच्याकडून घरभाडेही अधिक मिळते. त्यामुळे घरमालकही कोणतीही चौकशी किंवा पोलीस परवानगी न घेता त्यांना घरे उपलब्ध करून देतात. सध्या बोनकोडे गावात सर्वाधिक नायजेरियन्सचे वास्तव्य असल्याचे दिसून आले आहे. तर त्यापाठोपाठ जुहूगाव व कोपरखैरणे गावात त्यांचे अधिक प्रमाणात वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. मागील काही दिवसांत कोपरखैरणे गावात नायजेरियन नागरिकांची वस्ती वाढल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.