नवी मुंबई: कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी नोकरीनिमित्त मुंबईत आलेल्या तरुणीचा अपेक्षाभंग झाला आणि तिने आत्महत्या करत जीवन संपवले. २२ वर्षीय तरुणीने १२ हजारांच्या पगारात घरभाडे, घरखर्च तसेच आईवडिलांच्या गरजा भागविणे शक्य होत नसल्याची खंत डायरीत लिहून ठेवली आहे. नंदिनी तिवारी असे तिचे नाव असून, ती मूळची कानपूरची आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नंदिनीने बारावी पूर्ण केली आणि कुटुंबाचा आधार बनण्यासाठी मुंबईला आली होती. काही महिन्यांपासून ती एका कंपनीत १२ हजारांची नोकरी करत होती. ऐरोली सेक्टर १ येथे इतर तीन मुलींसोबत पेईंग गेस्ट म्हणून ती राहायची. तिच्या तीनही सहकारी गावी गेल्याने काही दिवसांपासून ती एकटीच होती. तिच्या मनमिळावू स्वभावामुळे शेजाऱ्यांसोबत तिची गट्टी जमली होती. शनिवारपासून ती कोणालाही भेटली नसल्याने व घराचा दरवाजा आतून बंद असल्याने शेजाऱ्यांनी रविवारी दुपारी बनावट चावीने घराचा दरवाजा उघडला. यावेळी हॉलमध्ये तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला.
मनातली खंत डायरीत व्यक्त केली घरात पाहणीवेळी तिची डायरी मिळून आली आहे. त्यात मिळणारा पगार व गरजा यांची सांगड जमत नसल्याची खंत तिने लिहिली असल्याचे महिला सहायक पोलिस निरीक्षक वृषाली पवार यांनी सांगितले. या आर्थिक अडचणीमुळे नैराश्य आल्याने पुन्हा कानपूरला जाणार असल्याचे तिने मैत्रिणीकडे बोलून दाखवले होते. आर्थिक अडचण, अपेक्षाभंग यातून तिने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. याबाबत तिच्या कुटुंबीयांना कळविले असून ते आल्यानंतर अधिक गोष्टी स्पष्ट होऊ शकतील.