नेरूळ येथे ६ जुलै रोजी रेल्वेच्या एका दुर्लक्षित इंजिनजवळ घडलेल्या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या आरव श्रीवास्तव या शाळकरी मुलाचा १२ जुलै रोजी ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहा दिवस अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या आरवने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. ही घटना टाळता आली असती, मात्र रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी आरव श्रीवास्तव आपल्या तीन मित्रांसह, रुझान भंडारी, कनिष्क देबाशिष मुखर्जी आणि मानस विकास पाटील, यांच्यासह नेरूळ परिसरात थांबलेल्या एका कचरा संकलन गाडीला जोडलेल्या रेल्वे इंजिनजवळ गेले. अनेक उत्सुक किशोरवयीन मुलांप्रमाणे, त्यांनाही निष्क्रिय उभ्या असलेल्या या इंजिनजवळ जाण्याची उत्सुकता होती. मात्र, त्यांना डोक्यावरील उच्च-दाबाच्या तारांपासून असलेल्या गंभीर धोक्याची जराही कल्पना नव्हती.
घटनास्थळी कोणतीही कुंपण, धोक्याचे फलक, सूचना फलक किंवा रेल्वे कर्मचारी उपस्थित नव्हते. या मुलांना संभाव्य धोक्याबद्दल सावध करता आले असते. मात्र, तिथे धोक्याची कोणतीही सूचना नव्हती. आरव श्रीवास्तवने केवळ निष्पाप कुतूहलापोटी या थांबलेल्या रेल्वे इंजिनवर चढण्याचा प्रयत्न केला. ही दुर्दैवी घटना तेव्हा घडली जेव्हा उच्च-दाबाच्या तारांमधून विद्युत प्रवाहामुळे 'आर्क फ्लॅश' (Arc Flash) झाला. प्रत्यक्ष स्पर्श झालेला नसतानाही, केवळ जवळ आल्याने हा वीजेचा करंट इतका जोरात लागला की, त्यामुळे आरव गंभीर रित्या भाजला.
आरवची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ऐरोली येथील बर्न्स रुग्णालयात (Burns Hospital) हलवण्यात आलं होतं. तिथे तो सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट केले आहे की, ही घटना केवळ एक अपघात होती आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टंट किंवा 'रील्स' बनवले जात नव्हते. या प्रकरणात 'मेडिकल लीगल केस' नोंदवण्यात आली असून, तिन्ही मुलांची पुढील चौकशी सुरू आहे.