पूर्ण तालुक्यात पालिका हवी
By Admin | Updated: February 17, 2016 02:23 IST2016-02-17T02:23:02+5:302016-02-17T02:23:02+5:30
पनवेल महानगरपालिका होणार की नाही, याबाबत शहरातील नागरिकांना प्रशासन संभ्रमात टाकत असून, अगोदर प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी

पूर्ण तालुक्यात पालिका हवी
तळोजा : पनवेल महानगरपालिका होणार की नाही, याबाबत शहरातील नागरिकांना प्रशासन संभ्रमात टाकत असून, अगोदर प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. सिडकोने या परिसरात भविष्यात नवी मुंबई विमानतळ, नैना, महानगरपालिका, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी यासारख्या सुविधांचे गाजर दाखवले आहे. महानगरपालिका होण्याला आमचा विरोध नाही, मात्र यातील एकच निर्णय घेणे गरजेचे आहे.
संपूर्ण तालुक्याचा समावेश या महानगरपालिकेत करावा, असे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांनी सांगितले. पनवेल ‘महानगरपालिका : फायदा की तोटा?’ या विषयाला अनुुसरून गोल्डन ग्रुप, पनवेलच्या वतीने सर्वपक्षीय महाचर्चेचे आयोजन वासुदेव बळवंत फडके सभागृहात करण्यात आले होते.
‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी या चर्चासत्राची धुरा सांभाळली.भाजपाच्या वतीने जयंत पगडे उपस्थित होते. या महाचर्चेत जगदीश गायकवाड, तळोजा असोसिएशनच्या जयश्री काटकर, बाळाराम पाटील, महेंद्र घरत, के. के. म्हात्रे, शिवसेना नेते चंद्रशेखर सोमन, एमसीएचआयचे विलास कोठारी, पनवेल औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विजय लोखंडे, कफ फोरमचे अध्यक्ष अरु ण भिसे आदी मान्यवर या सभेत सहभागी झाले होते.
चचेत शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रशेखर सोमण यांनी यावेळी संपूर्ण पनवेल तालुक्याचा समावेश महानगरपालिकेत करण्याची मागणी केली, तर कफचे अरु ण भिसे यांनी कुणीतरी येतो आणि रस्ता खोदून पाइपलाइन टाकतो, ही पनवेलची शोकांतिका असून ही मानसिकता बदलायला हवी.
पनवेलला भेडसावणाऱ्या पाणीसमस्येकडे शासनाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पनवेलकरांसाठी महापालिका पाण्याचा स्रोत म्हणून उपाययोजना करणार आहे का, या मागणीच्या व पनवेलच्या समस्येच्या आधारे ही महाचर्चा रंगली. काहीही करा, पण येथील शेतकरी व गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी तत्पर असणारी व्यवस्था करा.
सिडकोने आधी या संपूर्ण क्षेत्राचा विकास करा. महापालिका करा, पण त्याची आता गरज आहे का? पनवेलच्या सोयीसुविधांवर भर देत स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावे. निवांत महानगरपालिका करण्याचा निर्णय घेतला तर काही वावगे ठरणार नाही, असे शेकापचे चिटणीस बाळाराम पाटील म्हणाले. (वार्ताहर)