aमुंबई बाजारसमितीत माथाडी कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:35 IST2020-11-11T23:35:04+5:302020-11-11T23:35:25+5:30
आकसाने महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.

aमुंबई बाजारसमितीत माथाडी कामगारांचे आंदोलन
नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी सरकारला जाब विचारल्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तडकाफडकी रद्द केल्या आहेत. याचे तीव्र पडसाद मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये उमटले असून, बुधवारी सकाळी दोन तास मार्केट बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आला. शासनाने तत्काळ पुन्हा नियुक्त्या करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.
राज्यात भाजप सरकार असताना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदावर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली होती. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही या नियुक्त्या कायम ठेवण्यात आल्या होत्या. मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील यांनी सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर तडकाफडकी त्यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. यामुळे मराठा समाजासह माथाडी कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी सकाळी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील कांदा, बटाटा, फळ, धान्य व मसाला मार्केटमधील काम थांबवून, कामगार माथाडी भवनसमोर एकत्र आले होते. कामगारांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या.
आकसाने महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. मराठा समाजासह माथाडी कामगारांवर अन्याय केला आहे. सरकारने तत्काळ पुन्हा महामंडळाच्या अध्यक्षपदावर नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करावी व इतर पदाधिकाऱ्यांचीही पुन्हा नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. दुपारी १२ वाजता आंदोलन मागे घेतल्यानंतर बाजारसमितीमधील व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले. माथाडी भवनसमोर संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील इतर पदाधिकारी उपस्थित होते.