पनवेलच्या उड्डाणपुलाला गळती
By Admin | Updated: June 30, 2017 03:07 IST2017-06-30T03:07:21+5:302017-06-30T03:07:21+5:30
१८० कोटी रु पये खर्च करून बांधलेल्या नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाला पावसाळ्यात गळती लागली आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळाकडून

पनवेलच्या उड्डाणपुलाला गळती
मयूर तांबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : १८० कोटी रु पये खर्च करून बांधलेल्या नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाला पावसाळ्यात गळती लागली आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळाकडून यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे चालक वर्गात नाराजी पसरली आहे.
पनवेल शहरात दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. ही कोंडी टाळण्यासाठी तब्बल १८० कोटी रुपयांचा हा उड्डाणपूल बांधण्यात आला. २०१३मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, या उड्डाणपुलाकडे रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. उड्डाणपुलावरील रम्बल निघून गेले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उड्डाणपुलावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. मात्र, ही पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे पाणी थेट रस्त्यावर पडते. त्यामुळे खालून जाणारे दुचाकीस्वार, पादचारी यांना पाण्याचा अभिषेक होतो. यामुळे अपघाताची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. वरून पडणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना धबधब्याचा भास होत आहे. रस्ते विकास महामंडळाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यायची मागणी होत आहे.