एमआयडीसीच्या पाण्यात अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:50 IST2018-12-01T23:50:27+5:302018-12-01T23:50:32+5:30
नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो.

एमआयडीसीच्या पाण्यात अळ्या
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. दिघा येथे या पाण्यात अळ्या आढळल्या आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते यांनी प्रशासनाला धारेवर धरत प्रशासनाचे दिघा भागात दुर्लक्ष असून, नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोरबे धरणातू संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात नाही. पावणे ते दिघा भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. आठवड्यातून एक दिवस एमआयडीसीकडून पाणी बंद ठेवण्यात येते, तसेच त्यानंतर दोन-तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. दिघा भागात पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी उच्चस्तरीय आणि भूमिगत जलकुंभ नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी या पाण्यात अळ्या आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी महापे ते दिघा पाण्याच्या लाइनचे काम सुरू असून, आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. एमआयडीसीकडून पुरवठा होणाऱ्या पाण्याची पाहणी करून पाण्याच्या लाइन स्वच्छ करण्याबाबत एमआयडीसीलाला सांगण्यात येईल. ओएस वनच्या भूखंडावर पाण्याच्या अनुषंगाने टाक्यादेखील बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी एमआयडीसी जरी पाणीपुरवठा करीत असली, तरी महापालिकेच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत, अधिकाºयांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि असे प्रकार घडू नयेत, या दृष्टीने काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले.