तळोजा एमआयडीसी प्रदूषणाच्या विळख्यात
By Admin | Updated: February 21, 2016 02:36 IST2016-02-21T02:36:08+5:302016-02-21T02:36:08+5:30
प्रदूषणामुळे नावारूपाला येत असलेली तळोजा एमआयडीसीची प्रदूषणासंबंधित समस्या कमी होत नसून, स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत

तळोजा एमआयडीसी प्रदूषणाच्या विळख्यात
- शैलेश चव्हाण, तळोजा
प्रदूषणामुळे नावारूपाला येत असलेली तळोजा एमआयडीसीची प्रदूषणासंबंधित समस्या कमी होत नसून, स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ खूप गंभीर पावलं टाकत असल्याचे सांगितले जाते, मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात प्रदूषणाने थैमान घातले असून, याचा भयंकर त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या विभागातील एकही नेता या गावांच्या समस्या जाणून घेत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीत सुमारे ८८९ छोटे मोठे कारखाने असून, या परिसरात काही कंपन्या बेसुमार खुलेआम प्रदूषण करीत असल्याचे दिसून येते आहे. यांच्यावर एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण नसल्याने याचा त्रास परिसरातील पडघे, देवाचा पाडा, चिंध्रणगाव, नावडे, रोडपाली, पेंधर, टोंडरे, निरलस, सिध्दीकरवले, घोट व परिसरातील इतर खेडे गावांना होत आहे. या औद्योगिक वसाहतींमधून निर्मळ वाहणारी कासाडी नदी दूषित झाली आहे. रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने रासायनिक पाणी नदीच्या पात्रात सोडण्याचे प्रकार सुरू आहेत. या प्रदूषित पाण्यामुळे नदीतील मासे गायब झाले असून, मासे पकडून उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामस्थांचा सध्या दुष्काळ सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बेलापूर रायगड भवन येथे बसतात. त्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या प्रदूषणाची गंभीरता मंडळाच्या लक्षात येत नाही का, असे प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहेत.
तळोजा औद्योगिक वसाहत व तळोजा सीईटीपीसोबत बैठका सुरू असून, प्रदूषणावर ठोस भूमिका घेण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहोत. दूषित पाणी वाहिन्यांची दुरु स्ती व नवीन जोडणी लवकरच करण्यात येणार आहे.
- नागेश लोहळकर, प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ
स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहेत, मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रात वाढत असलेल्या प्रदूषणाने स्थानिक ग्रामस्थांची झोप उडविली आहे. कासाडी नदीला लागून असणारे कारखानदार बिनधास्त या नदीच्या पात्रात छुप्या पध्दतीत दूषित पाणी सोडत आहेत. त्यामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारची पाळी आली आहे. लवकरच याविषयी आंदोलन छेडण्यात येईल.
- एकनाथ देशेकर,
ग्रामस्थ चिंध्रण, जि.प. सदस्य