कर्जतमधील खारबेवाडीत पाणीटंचाई

By Admin | Updated: May 24, 2017 01:25 IST2017-05-24T01:25:42+5:302017-05-24T01:25:42+5:30

कर्जत तालुक्यातील खारबेवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने सात ते आठ मैल पायपीट करून पिण्यायोग्य पाणी आणावे लागते आहे

Kharbebadi water crisis in Karjat | कर्जतमधील खारबेवाडीत पाणीटंचाई

कर्जतमधील खारबेवाडीत पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील खारबेवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने सात ते आठ मैल पायपीट करून पिण्यायोग्य पाणी आणावे लागते आहे. या तहानलेल्या ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी युवा प्रबोधिनी मंडळ मांडवणे या सेवाभावी संघटनेने मदतीचा हात पुढे केला असून, टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
कर्जत तालुक्यातील अनेक गावे व आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईची झळ जाणवते. आदिवासीवाड्यांतील ग्रामस्थांप्रमाणेच शेतकऱ्यांनासुद्धा पाणीटंचाईची समस्या भेडसावत असून, जनावरांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. खारबेवाडी या परिसरातील ग्रामस्थांची पिण्यायोग्य पाणी आणण्यासाठी महिला व गावातील लहान मुले जवळजवळ सात ते आठ मैल चालून हंडाभर पाणी आणत आहेत. पाण्यासाठी मोठी कसरत या वाडीतील महिलांना करावी लागत आहे. युवा प्रबोधिनी मंडळ मांडवणे यांना ही बाब केलेल्या सर्वेक्षणात दिसून आली. त्यानंतर त्यांनी तातडीने बैठक बोलावून ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरविण्याचे निश्चित केले.
दुर्गम भागातील वाडी-वस्त्यांवर पोहोचणे शासनस्तरावर सहज शक्य नसल्याने शासन कायमच सेवाभावी संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत असते. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत युवा प्रबोधिनी मंडळ मांडवणे यांनी मदतीचा हात दिला.
युवा प्रबोधिनी या संस्थेने लगेचच काही आगाऊ रक्कम जमा करून या गावाचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे काम हाती घेतले. रविवारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी पाण्याचे टँकर आणून गावाला पाणीपुरवठा केला.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष किरण कर्णूक, उपाध्यक्ष नीतेश मसणे, सल्लागार केतन भोसले, खजिनदार अंकुश रेवाळे, सहखजिनदार सागर कर्णूक, सचिव रोहिदास नाईक, सहसचिव रोशन सावंत, तसेच मांडवणे ग्रामपंचायत सरपंच अंजली गांदिवले व सदस्या हिंदोळ या वेळी उपस्थित होत्या.


पाणीप्रश्नाविषयी
के लीचर्चा
१युवा प्रबोधिनी मंडळाच्या सदस्यांनी पाण्याचे महत्त्व व पाणीटंचाईची समस्या कशी सोडवता येईल, याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व गावाची पाण्याची समस्या लवकरात लवकर कशी सोडवता येईल, त्याविषयी सरपंच अंजली गांदिवले व सदस्या हिंदोळा यांच्यासमवेत चर्चा केली.
२रविवारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी पाण्याचे टँकर आणून गावाला पाणीपुरवठा केला. यामुळे काही प्रमाणात का होईना, येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, या पाणीपुरवठ्या बाबत समाधान व्यक्त के ले आहे.

Web Title: Kharbebadi water crisis in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.