जेएनपीटी ते उलवेदरम्यान तिसरा सागरी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:57 IST2019-03-09T00:57:53+5:302019-03-09T00:57:55+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीच्या अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.

जेएनपीटी ते उलवेदरम्यान तिसरा सागरी मार्ग
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीच्या अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. पामबीच व खारघर-बेलापूरनंतर आता जेएनपीटी (बेलपाडा) ते उलवे या दरम्यान १0.१0६ मीटर लांबीचा तिसरा सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याच्या ५.८ कि.मी. लांबीच्या मार्गासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. डिसेंबर २0२१ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. विमानतळाचे काम प्रगतिपथावर असतानाच विमानतळाला जोडणाऱ्या रस्ते वाहतुकीवरही सिडकोने भर दिला आहे. शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान २२ किमी लांबीच्या मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) रोडच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी सिडकोने जेएनपीटी-उलवे दरम्यान १0.१0६ किलोमीटर लांबीचा नवीन सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग जेएनपीटी (बेलपाडा) येथून सुरू होणार असून पुढे जासई टेकड्यांच्या पायथ्याशी शिवाजीनगर येथील प्रस्तावित एमटीएचएलला जोडला जाणार आहे. येथून हा मार्ग उलवे किनारपट्टीवरून पुढे जाणार आहे. पनवेल खाडीवरील आम्रमार्ग हा या मार्गाचा शेवटचा टप्पा असणार आहे. त्यामुळे जेएनपीटीला जोडणारा दुसरा जोडमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग-४बी आणि राज्य
महामार्ग -५४ वरून आम्रमार्गावर येणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. दोन टप्प्यात हा सागरी मार्ग बांधण्याचे सिडकोने निश्चित केले आहे. पहिला टप्पा आम्रमार्ग जंक्शन ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजीनगर ते जेएनपीटी (बेलपाडा) असा असणार आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा १.२ किमी लांबीचा जोड रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
खारघर ते बेलापूरदरम्यान ९.५ किमी लांबीचा सागरी मार्ग (कॉरिडोर) उभारण्याचा निर्णय सिडकाने घेतला आहे. या कॉरिडोरसाठी २७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा मार्ग उलवे आम्रमार्ग येथे प्रस्तावित सागरी मार्गाला जोडला जाणार आहे. यापूर्वी सिडकोने वाशी ते बेलापूर दरम्यान १३ किमी लांबीचा पामबीच हा सागरी मार्ग बांधला आहे.