जिल्ह्यातील टंचाईवर ‘जलक्रांती’चा उतारा
By Admin | Updated: March 16, 2017 03:11 IST2017-03-16T03:11:48+5:302017-03-16T03:11:48+5:30
जिल्ह्यात असलेले पाण्याचे भीषण दुर्भिक्ष दूर करण्यासाठी ‘रायगडची जलक्रांती...एक प्रयत्न’ असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे

जिल्ह्यातील टंचाईवर ‘जलक्रांती’चा उतारा
आविष्कार देसाई , अलिबाग
जिल्ह्यात असलेले पाण्याचे भीषण दुर्भिक्ष दूर करण्यासाठी ‘रायगडची जलक्रांती...एक प्रयत्न’ असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. जिल्ह्यात बेसुमार पाऊस पडूनही नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. टंचाई कृती आराखड्याच्या रकमेवरून ते स्पष्ट दिसून येते. यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून जलक्रांती हा विशेष प्रकल्प २०१९पर्यंत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात जनतेचाही सहभाग अपेक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी ६ कोटी २५ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये ३७६ गावे आणि एक हजार १०९ वाड्या, अशा एकूण एक हजार ४७६ योजनांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील १२६ गावे आणि ३८६ वाड्यांमध्ये तब्बल ५१२ विंधण विहिरी (बोअरवेल) खोदण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासन २ कोटी ५६ लाख रुपये खर्च करणार
आहे.
अलिबाग, महाड आणि पोलादपूरमध्ये प्रत्येकी ५७ बोअरवेल खोदण्यासाठी ८७ लाख रुपये खर्च होणार आहेत. याच तीन तालुक्यांमध्ये टँकरनेही पाणीपुरवठा करण्यासाठी एकत्रित १ कोटी २७ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहेत.
इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये या तीन तालुक्यांवर बेसुमार खर्च होणार आहेत. याच तालुक्यामध्ये जलक्रांतीसाठी विशेष प्रयत्न प्रशासनाने केले आहेत. अन्य तालुक्यांमध्येही जलक्रांतीच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, तलावातील गाळ काढणे, वृक्ष लागवड करणे, असे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. यासाठी विविध संस्थांमार्फत कोट्यवधी रुपयांचा सीएसआर फंडही प्रशासनाच्या तिजोरीत जमा झालेला होता. पाण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाही पावसाचे प्रचंड प्रमाणातील पाणी अडविण्यात म्हणावे तसे यश आलेले दिसून येत नाही. त्यामुळेच प्रशासनाला डिसेंबरअखेर टंचाई कृती आराखडा आखून पाण्याचे दुर्भिक्ष दूर करावे लागते.
पेण तालुक्यातील खारेपाट विभागासह म्हसळ््यामध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अन्य तालुक्यांतही थोडी अधिक पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्या माध्यमातून टंचाईवर मात करता येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते ही जमेची बाजू आहे.
- एस. वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा
तीन तालुक्यांतील जलक्रांती
१अलिबाग : ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत गेल्या दोन वर्षांमध्ये मृद व जलसंधारणाची आठ कामे पूर्ण झाली आहेत. दगडी बांध-१, शेततळे-१ सिमेंटनाला बांध-१, सिमेंट बांध दुरुस्ती-१ वळण बंधारा-१, वन तलाव- १, जलशोषक चर-१ या सर्व कामांमुळे ५२ टी.सी.एम. अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.२महाड : गेल्या दोन वर्षांमध्ये मृद व जलसंधारणाची ७९ कामे पूर्ण झाली आहेत. सलग समतर चर- ४३, अनघड दगडी बांध-९, सिमेंटनाला बांध-८, जुनी भात शेती दुरुस्ती-९ वळण बंधारा-२, या कामांमुळे २११ टी.सी.एम. अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.३पोलादपूर : गेल्या दोन वर्षांमध्ये मृद व जलसंधारणाची ६६ कामे पूर्ण झाली आहेत. सलग समतर चर- २६, जुनी भातशेती दुरुस्ती-३३, या कामांमुळे ७२ टी.सी.एम. अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.