कांदा-बटाट्याची अवैध विक्री सुरूच
By Admin | Updated: June 3, 2017 06:39 IST2017-06-03T06:39:11+5:302017-06-03T06:39:11+5:30
भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर बाजार समिती, वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आशीर्वादाने कांदा - बटाट्याची अवैध विक्री

कांदा-बटाट्याची अवैध विक्री सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर बाजार समिती, वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आशीर्वादाने कांदा - बटाट्याची अवैध विक्री सुरू आहे. यामुळे रोज या परिसरात वाहतूककोंडी होत आहे. पालिकेच्या पदपथाचा वापर गोडावूनप्रमाणे केला जात असून याविषयी ठोस कारवाई केली जात नसल्याने निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
मुंबई बाजार समिती आवारामध्ये अन्नपूर्णा चौक ते माथाडी भवन दरम्यान रोज वाहतूककोंडी होवू लागली आहे. या वाहतूककोंडीला भाजी व फळ मार्केटच्या बाहेरील फेरीवाले व कांदा-बटाट्याची अवैध विक्री करणारे पूर्णपणे जबाबदार आहेत. भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर व विस्तारित मार्केटच्या मध्ये २६ व्यापारी कांदा - बटाट्याची विक्री करत आहेत. पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी बनविलेल्या पदपथावर शेकडो गोणी उतरवून ठेवल्या जात आहेत. यामुळे पदपथाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. पदपथ खचण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिक्रमणामुळे नागरिकांना रोडवरून चालावे लागत आहे. रोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.
कांदा - बटाट्याच्या अवैध व्यापाराविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर काही दिवस विक्रेत्यांनी येथील व्यवसाय थांबला होता, परंतु नंतर पुन्हा सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कारवाई करण्यासाठी गेलेल्या बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांना व्यापाऱ्यांनी हुसकावून लावले. अवैध विक्रेत्यांना वाहतूक पोलीस व महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे अभय मिळत आहे.
विभाग कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी कोणी कितीही विरोध केला तरी आम्ही तुम्हाला पाठिंबा देवू अशी आश्वासने दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कारवाई केलीच जात नसल्याने आता काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एपीएमसी वाहतूक चौकीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांविषयी पोलीस आयुक्त व उपआयुक्तांकडे व पालिका कर्मचाऱ्यांची महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून आयुक्त तरी यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंढेही काही करू शकले नाहीत
भाजी मार्केटच्या बाहेरील अवैध कांदा -बटाटा विक्रेत्यांना महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. यामुळे काही व्यापारी तुकाराम मुंढे असतानाही आमच्यावर कोणी कारवाई करू शकले नाही, मग रामास्वामी एन. यांना भिण्याचे काहीच कारण नाही अशा वल्गना केल्या जावू लागल्या आहेत.
बेलापूरमध्ये कारवाई एपीएमसीमध्ये अभय
पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी बेलापूरमध्ये फेरीवाल्यांना अभय दिल्यामुळे दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. परंतु एपीएमसीमध्ये वारंवार तक्रारी होवून व प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही कारवाई न करणाऱ्यांवर मात्र काहीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.