औद्योगिक वसाहतीतील नालेसफाई रखडली

By Admin | Updated: June 2, 2017 06:05 IST2017-06-02T06:05:39+5:302017-06-02T06:05:39+5:30

पावसाळापूर्व नालेसफाईची मुदत संपल्यानंतरही औद्योगिक वसाहतीमधील ५० टक्के कामेही पूर्ण झालेली नाहीत. अनेक

Industrial Colony Nallasfai Station | औद्योगिक वसाहतीतील नालेसफाई रखडली

औद्योगिक वसाहतीतील नालेसफाई रखडली

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पावसाळापूर्व नालेसफाईची मुदत संपल्यानंतरही औद्योगिक वसाहतीमधील ५० टक्के कामेही पूर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणी नालेसफाई सुरूच झालेली नाही. यामुळे पावसाळ्यात कंपन्यांमध्ये पाणी जाऊन नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीमध्ये नालेसफाई करण्याचा दिखावा करून ठेकेदाराच्या माध्यमातून पैसे लाटण्यात येत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. पालिका प्रशासन निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबईमध्ये नागरी वस्तीमधील नालेसफाईची कामे एक महिन्यापूर्वी सुरू केली आहेत; परंतु याही वर्षी औद्योगिक वसाहतीच्या साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नालेसफाईची कामे संपत आल्यानंतर बहुतांश ठेकेदारांनी कामे केल्याचा देखावा करण्यास सुरुवात केली आहे. दिघा येथील मुख्य नाल्यात दोन दिवसांपासून गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्यक्ष गाळ न काढता नाल्यातील प्लास्टिक व इतर कचरा उचलला जात आहे. विष्णूनगर परिसरामध्ये मुख्य रोडच्या बाजूला असलेल्या गटारांची दुरवस्था झालेली आहे. पाणी जाण्यासाठी गटारेच शिल्लक नसल्यानेच आत्ताच पाणी रोडवर येऊ लागले आहे. लोकमत प्रेस, एमआयडीसी मुख्यालय ते महापे सर्कलपर्यंत एमएमआरडीएने रोडचे काम करताना गटार तोडले आहे. यामुळे पावसाळ्यात ते सर्व पाणी रोडवर येण्याची शक्यता आहे. महापे ए ब्लॉकमध्येही नालेसफाईची कामे सुरू केलेली नाहीत. यामुळे डोंगरावरून येणारे पाणी कंपन्यांमध्ये व तेथून मुख्य रोडवर येणार आहे. महापे ते नेरुळ दरम्यान मुख्य डोंगरावरून येणारे पाणी खाडीकडे वाहून नेणाऱ्या मुख्य नाल्यांचीही साफसफाई करण्यात आलेली नाही. या नाल्याला जोडले जाणारे अनेक छोट्या गटारांची प्रचंड दुरवस्था झाली असून, त्यामधून पावसाचे पाणी जाऊच शकत नाही. यामुळे डोंगरावरील पाणी या परिसरातील झोपड्यांमध्ये व मुख्य रोडवरून वाहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बोनसरी गाव ते नेरुळपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे महापालिकेने काँक्रिटीकरण केले आहे; परंतु या रोडच्या बाजूला असलेल्या गटारामधील गाळ काढलेला नाही. अनेक ठिकाणी गटारांची कामे पूर्ण झालेली नाहीत. उरण फाट्यापासून आतमध्ये गेल्यानंतर रोडच्या बाजूला गटार शिल्लकच राहिलेले नाही. एमआयडीसीमधील बहुतांश नाल्यांची दुरवस्था झालेली आहे.
जे नाले सुस्थितीमध्ये आहेत त्यामधील गाळ काढण्यात आलेला नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असणारे प्रमुख अडथळेही दूर केलेले नाहीत. यामळे येणाऱ्या पावसात उद्योजक, कामगार, या परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे.

सभापतींनी बोलावली बैठक

शहरातील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी शुक्रवारी सकाळी स्थायी समिती सभागृहामध्ये सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे. नालेसफाईच्या कामांचा आढावा, नागरिकांच्या तक्रारी, अपूर्ण असलेल्या कामांविषयी माहिती घेतली जाणार असून, बैठकीमध्ये एमआयडीसीमधील नालेसफाईचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

ठेकेदारांना अभय : एमआयडीसी परिसरातील नालेसफाईच्या कामांवर महापालिका प्रत्येक वर्षी लाखो रूपये खर्च करत आहे. प्रत्यक्षात नालेसफाई योग्य प्रकारे होत नाही. ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत असल्यामुळे महापालिकेचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. यावर्षी एमआयडीसीतील नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी दोन दिवसांपूर्वी काम सुरू केले आहे. काही ठिकाणी अर्धवट काम करण्यात आले असून निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

एमआयडीसीमध्ये बहुतांश नाल्याची साफसफाई झालेली नाही. बोनसरी, इंदिरानगर व इतर काही ठिकाणी नाल्यातील गाळ काढला आहे; परंतु काढलेला गाळ डपिंग ग्राउंडमध्ये न टाकता, तो नाल्याच्या बाजूला व रोडवरच ठेवला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

यामुळे पाऊस आला की सर्व गाळ पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  या कामावर कोणाचेच लक्ष नसल्याने ठेकेदार त्यांच्या मर्जीप्रमाणे काम  करू लागले आहेत. महापालिका आयुक्त या कामांकडे लक्ष देणार  का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Industrial Colony Nallasfai Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.