पाण्याअभावी गैरसोय
By Admin | Updated: June 3, 2017 06:34 IST2017-06-03T06:34:50+5:302017-06-03T06:34:50+5:30
रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पाण्यावाचून चांगलाच ठणठणाट आहे. पाण्यासाठी प्रशासनाला टँकरचा आधार घ्यावा लागत

पाण्याअभावी गैरसोय
आविष्कार देसाई/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पाण्यावाचून चांगलाच ठणठणाट आहे. पाण्यासाठी प्रशासनाला टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. नगरपालिकेमार्फत होणाऱ्या पाणीटंचाईमुळे प्रशासनाने ३८ टँकर पाणी विकत घेतले आहे; परंतु हे पाणी दैनंदिन वापराच्या १० टक्केसुद्धा नसल्याने तुटपंज्या पाण्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांचे हाल होत आहेत. पालिका प्रशासनाने तातडीने पूर्ववत पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने अलिबाग नगरपालिकेला केली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. येथे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. येथे रोजचे सुमारे ५०० रुग्ण येतात. त्यापैकी काही रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी अॅडमिट करावे लागते. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक त्या ठिकाणी थांबतात. त्यांना पाण्याची व्यवस्था होत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी सुमारे दहा कोटी खर्च करण्यात येत आहेत. त्यातील काही काम अद्यापही प्रगतीपथावर आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा खर्च केला असताना मात्र जिल्हा रुग्णालयात पुरेसे पाणी नाही. रुग्णालय परिसरामध्ये सुमारे एक लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आहेत; परंतु पाण्याचा पुरवठा नियमित आणि पुरेसा होत नसल्याने त्या कोरड्या पडल्या आहेत. पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने रुग्णालय प्रशासन टँकरने पाणी मागवत आहे.
बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अशा दोन इमारती आहेत. त्याचप्रमाणे परिचारिका वसतिगृह त्याच परिसरामध्ये आहे. तेथेच कर्मचारी निवास संकुलही आहे. त्यांनाही पाण्याची चणचण भासत आहे. बाह्य रुग्ण विभागात विविध आजारांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र रूम आहेत. तेथे स्वच्छतागृहही आहे. याच इमारतीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांचे कार्यालय आहे. त्यामुळे त्यांचीही पाण्याची गरज मोठी आहे. आंतर रुग्ण विभागात आपतकालीन, अतिदक्षता कक्ष, प्रसूतिकक्ष, बाल रुग्ण, शस्त्रक्रिया विभाग, जळीत कक्ष, मेडिकल आणि सर्जिकल वार्ड, डायलिसिस विभाग, पाकगृह यांसह अन्य विभाग आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना दैनंदिन वापरासाठी पाणीच उपलब्ध नसते.
प्रशासनामार्फत प्रत्येक वार्डच्या स्वच्छतागृहात पाण्याच्या दोन टाक्या भरून ठेवलेल्या असतात. मात्र, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची संख्या पाहता, ते पाणी त्यांना पुरत नाही. स्वच्छता राखण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे.
नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी उपलब्ध होत नाही. पुरवठा पूर्ववत करण्याबाबत पत्र दिले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नगरपालिका काही प्रमाणात पाण्याचा पुरवठा करणार असल्याचेही गवळी यांनी स्पष्ट केले. मात्र, तो तुटपुंजा असणार आहे. यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. महिला, लहान मुलांना मैलोन्मैल पायपीट करून पाणी आणावे लागते. पाण्याअभावी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. मात्र जिल्हा
रु ग्णालयात देखील पाणी समस्या असल्याने
रु ग्णांसह नातेवाइकांचे हाल होत आहेत. आरोग्य सेवा मिळते त्याच ठिकाणी जर अशी पाणीसमस्या आहे, याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तीन दिवसांपासून सुरळीत पाणीपुरवठा
पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. आता गेल्या तीन दिवसांपासून सुरळीत करण्यात आला असल्याचे अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले; परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे.
नगरपालिकेने काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केल्याचा दावा केला असला, तरी गुरुवारी सायंकाळी जुन्या पोस्टाची गल्ली, घोलकरवाडी यासह अन्य काही परिसरात पाणीच आले नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचा दावा खोटा ठरत असल्याचे स्पष्ट होते.
११ आणि १२ मे या कालावधीत प्रशासनाने आठ टँकर मागविले होते. त्यानंतर १७ मे रोजी सहा, २४ मेला १०, ०१ आणि ३१ मे रोजी अनुक्रमे चार आणि सहा टँकर मागवण्यात आले होते. यासाठी प्रशासनाच्या तिजोरीवर १९ हजार रुपयांचा फटका बसला आहे. टँकरने पाणी मागविण्यावर मर्यादा असल्याने पाण्याचा प्रचंड तुटवडा पडत आहे.
अंतर रुग्ण विभागात आपत्कालीन, अतिदक्षता कक्ष, प्रसूतीकक्ष, बाल रुग्ण, शस्त्रक्रिया विभाग, जळीत कक्ष, मेडिकल आणि सर्जिकल वार्ड, डायलिसिस विभाग, पाकगृह यांसह अन्य विभाग आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना दैनंदिन वापरासाठी पाणीच उपलब्ध नसते.
प्रशासनामार्फत प्रत्येक वार्डच्या स्वच्छतागृहात पाण्याच्या दोन टाक्या भरून ठेवलेल्या असतात. मात्र, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची संख्या पाहता, ते पाणी त्यांना पुरत नाही. स्वच्छता राखण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे.
रायगड जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर रु ग्ण येतात, त्यांना रुग्णालयात आल्यावर प्रथम पाणी समस्येलाच सामोरे जावे लागत आहे. दिवसभर रु ग्णांबरोबर थांबणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांना देखील पाणी विकत घ्यावे लागत आहे. हे या ग्रामीण जनतेला न परवडणारे आहे.