बदली न झाल्यास लढा सुरूच राहणार!

By Admin | Updated: October 27, 2016 04:13 IST2016-10-27T04:13:19+5:302016-10-27T04:13:19+5:30

आयुक्तांच्या कार्यशैलीवर १०४ नगरसेवकांनी अविश्वास दाखविला आहे. महापालिकेचे कामकाज करण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहिलेला नाही. शासनाने त्यांची तत्काळ बदली

If there is no replacement, the fight will continue! | बदली न झाल्यास लढा सुरूच राहणार!

बदली न झाल्यास लढा सुरूच राहणार!

नवी मुंबई : आयुक्तांच्या कार्यशैलीवर १०४ नगरसेवकांनी अविश्वास दाखविला आहे. महापालिकेचे कामकाज करण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहिलेला नाही. शासनाने त्यांची तत्काळ बदली केली नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी दिला आहे. मनपा मुख्यालयामध्ये ठिय्या देण्यासह प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही तुकाराम मुंढे यांची बदली होणार की नाही याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. मुंढे यांच्या विरोधात व समर्थनामध्ये सोशल वॉर अद्याप सुरूच आहे. महापौरांसह नगरसेवकांनी बदलीसाठी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. आयुक्त प्रामाणिक व धडाडीचे अधिकारी असल्यामुळे प्रथम त्यांचे स्वागतच केले होते. पण सर्वांना विश्वासात घेवून काम करण्यात ते अपयशी ठरले असल्याचे मत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. भ्रष्टाचार बाहेर काढल्याने त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचल्याच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले जात आहे. महापौर व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेवून आयुक्तांमुळे पालिकेत तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यांना पालिकेत येण्यास मज्जाव करावा अशी विनंती केली आहे. शासनाने बदली केली नाही तर मनपा मुख्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय जनताही बदलीसाठी रस्त्यावर उतरेल असे मत महापौरांनी व्यक्त केले आहे. जनतेचा विश्वास त्यांनी गमावला आहे. शहरहिताच्या कामाचा दिखावा केला जात असून प्रत्यक्षामध्ये आयुक्तांनी केलेल्या कारवाईचे बुमरँग झाले आहे. बहुतांश सर्व कारवायांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गरिबांवर अन्याय होत असल्याची खंत महपौरांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेमध्ये २४ वर्षांमध्ये अनेक विकासकामे झाली आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकमेकांमध्ये संवाद ठेवून पालिकेचा कारभार केला. पण मागील पाच महिन्यांमध्ये अधिकारी व कर्मचारी दहशतीखाली वावरत आहेत. लोकप्रतिनिधींचा अवमान केला जात आहे. लोकहिताची कामे होत नसून मनपा आयुक्त स्वत:लाच प्रसिद्धी कशी मिळेल याकडे लक्ष देत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. आयुक्त विरोधी मोहीम तीव्र होत असताना त्यांच्या समर्थनासाठी मनसेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्य सचिवांची भेट घेवून बदली करू नये अशी मागणी केली आहे. माजी उपमहापौर अनिल कौशिक यांनी बदली होवू नये यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला
आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्या भांडणामध्ये पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सानुग्रह अनुदान रखडले आहे. स्थायी समितीने सानुग्रह अनुदानास मंजुरी दिली आहे पण महासभा न झाल्याने अंतिम मंजुरी होवू शकलेली नाही. प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंतच सभा घेणे आवश्यक असते. यामुळे आॅक्टोबरची सभा होणार नसून सानुग्रह अनुदान मंजुरीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या सभेची वाट पहावी लागणार आहे.

प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात घेवून काम करण्यात आयुक्त अपयशी ठरले आहेत. त्यांनी हॉटेल, मॉल्स, एपीएमसीमध्ये केलेल्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कारवाईच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे शहराचे व नागरिकांचे नुकसानच झाले असून त्यांच्या बदलीसाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
- सुधाकर सोनावणे, महापौर

आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला असून तो शासनाकडे पाठविला आहे. मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांमध्ये बदली झाली नाही तर लोकशाही पद्धतीने लढाई सुरूच राहील.
- शिवराम पाटील,
सभापती, स्थायी समिती

Web Title: If there is no replacement, the fight will continue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.