महायुती सत्तेवर आल्यास रिपाइंचा सत्तेत १५ टक्के वाटा
By Admin | Updated: June 19, 2014 00:32 IST2014-06-19T00:32:05+5:302014-06-19T00:32:05+5:30
पोलादपूर येथे एका कार्यक्रमासाठी खासदार आठवले आले असता महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार आठवले यांनी हे वक्तव्य केले.

महायुती सत्तेवर आल्यास रिपाइंचा सत्तेत १५ टक्के वाटा
महाड : लोकसभा निवडणुकीप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचा धुव्वा उडून महायुती सत्तेवर आल्यास सत्तेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पंधरा टक्के वाटा राहील अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली.
पोलादपूर येथे एका कार्यक्रमासाठी खासदार आठवले आले असता महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार आठवले यांनी हे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील दलित मतदार हे अन्य कुठल्याही पक्षासोबत नसून रिपब्लिकन पक्षासोबत आणि महायुतीसोबतच हे मतदार असल्याचा निर्वाळा खासदार आठवले यांनी यावेळी दिला.
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यास महाराष्ट्रात सत्ता मिळू शकेल अशी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना खात्री होती, त्यांचे स्वप्न येत्या विधानसभा निवडणुकीत पुर्ण होणारच असा विश्वासही खासदार आठवले यांनी व्यक्त केला. येत्या विधानसभा निवडणुकीत रायगडमधील कर्जत आणि रत्नागिरीमधील एक विधानसभा मतदार संघ रिपाइंला सोडण्याची आपली मागणी आहे. महायुतीकडे या निवडणुकीत जास्त जागा मागण्यापेक्षा कमी जागाची मागणी करून त्या निवडून आणण्यासाठी आपण ताकद पणाला लावणार आहोत.
मुंबई गोवा महामार्गावर नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी या मार्गाचे चौपदरीकरण लवकरच होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य आठवले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मीच आहे पण हा वाद सध्या न्यायालयात व धर्मादाय आयुक्तांकडे सुरू असल्याचे आठवले यांनी सांगितले. (वार्ताहर)