पर्युषण पर्वात जैन धर्मीयांच्या घरावर हातोडा
By Admin | Updated: September 1, 2016 03:39 IST2016-09-01T03:39:38+5:302016-09-01T03:39:38+5:30
पर्युषण पर्व सुरू असताना सीवूडमधील लक्ष्मी टॉवरमधील जैनधर्मीय नागरिकाच्या घरावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

पर्युषण पर्वात जैन धर्मीयांच्या घरावर हातोडा
नामदेव मोरे, नवी मुंबई
पर्युषण पर्व सुरू असताना सीवूडमधील लक्ष्मी टॉवरमधील जैनधर्मीय नागरिकाच्या घरावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. याच इमारतीमध्ये महापालिकेचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत तायडे व प्रकाश वाघमारे यांनीही अतिक्रमण केले असून त्यांच्या घरावर कोणतीच कारवाई केलेली नाही. पालिकेच्या पक्षपाती व हुकूमशाही कारभारामुळे शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सीवूड रेल्वे स्टेशनसमोर लक्ष्मी टॉवर इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील दोन घरांमधील विनापरवाना केलेल्या बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. उत्पल मंडल व प्रिया जैन यांच्या घरामध्ये तयार केलेला पोटमाळा हटविण्यात आला. पर्युषण पर्व सुरू असल्यामुळे जैन यांचा व त्यांच्या दोन्ही मुलांचा उपवास सुरू आहे. पर्युषण पर्व हे जैनधर्मीयांसाठी पवित्र पर्व आहे. ३ व ४ सप्टेंबरला घरामध्ये नातेवाईक व इतर ओळखीचे नागरिक धार्मिक समारंभाला येणार आहेत. यामुळे चार दिवस कारवाई करू नये अशी विनंती केल्यानंतरही पालिकेच्या पथकाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. आम्ही कारवाई करणारच, विरोध केल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा त्यांना देवून कारवाई सुरू केली. आम्ही अतिक्रमण केले नाही. हे घर महापालिकेच्या सहायक आयुक्त संध्या अंबादे यांच्या मालकीचे होते. त्यांनी चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला विकले व आम्ही त्यांच्याकडून खरेदी केले. घर विकत घेतल्यानंतर आम्ही कोणतेही बांधकाम केले नाही. घराचा रंगही बदललेला नाही. आमचा काहीही दोष नसताना आमच्यावर सण व उत्सवाच्या काळात कारवाई का, अशी विचारणा केल्यानंतरही प्रशासनाने त्यांचे काहीही ऐकले नाही.
जैनधर्मीयांच्या ज्या घरावर कारवाई केली त्याविषयीची तक्रार दोन वर्षांपूर्वीच केली होती. अतिक्रमण विभाग, आयुक्त व तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्येही तक्रार केली होती. पालिकेच्या अधिकारी संध्या अंबादे यांचे घर असल्याचेही तेव्हा तक्रारीत उल्लेख केला होता. परंतु तेव्हा काहीही कारवाई न करणाऱ्या अतिक्रमण विभागाने धार्मिक सण, उत्सवाच्या काळात आकसाने कारवाई केल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. लक्ष्मी टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर यापूर्वी अतिक्रमण विभागात सहायक आयुक्त असलेले प्रकाश वाघमारे व प्रशासन विभागात अनेक वर्षांपासून सहायक आयुक्त असलेल्या चंद्रकांत तायडे रहात आहेत. त्यांनी पहिल्या मजल्यावर अतिक्रमण केले आहे. टेरेसवर पत्रा टाकून त्यांच्या ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनीच अतिक्रमण केलेले असताना व इमारतीमधील अपवाद वगळता सर्वांनीच अतिक्रमण केलेले असताना फक्त दोन घरांवर कारवाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
तायडे, वाघमारेंवर कारवाई कधी?
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे लक्ष्मी टॉवरमध्ये १०२ क्रमांकाच्या सदनिकेमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांनीही टेरेसवर पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केले आहे. वाघमारे हे यापूर्वी अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त होते. ही इमारत असलेल्या बेलापूर विभाग कार्यालयाचे ते विभाग अधिकारीही होते. चंद्रकांत तायडे यांच्याकडे यापूर्वी प्रशासन, उद्यान व इतर अनेक विभागांचा कार्यभार होता. ते या टॉवरमधील १०३ नंबरच्या सदनिकेमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांनीही अतिक्रमण केले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का, असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.
मुंढे साहेब, हाच का नि:पक्षपातीपणा?
महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची निवड झाल्यानंतर शहरात नि:पक्षपातीपणे अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात शहरात पक्षपाती कारवाई सुरू झाली आहे. सोसायटीमधील वैयक्तिक भांडण असणारे नागरिक पालिकेकडे आपल्याच शेजाऱ्यांची तक्रार करत असून पालिका कोणताही विचार न करता त्यावर कारवाई करून पैसा व वेळ फुकट घालवत आहे. सीवूडमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना अभय देवून सामान्य नागरिकाच्या घरांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय याच परिसरामध्ये सार्वजनिक बसस्टॉपवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मार्केटच्या भूखंडावर धार्मिक स्थळाच्या नावाखाली जागा अडविण्यात आली असून सामान्य नागरिकांवर कारवाई होत असल्याने मुंढे साहेब हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
अंबादेवर कारवाई का नाही?
महापालिकेने प्रिया जैन यांच्या घरावर कारवाई केली आहे. परंतु ही सदनिका महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त संध्या अंबादे यांच्या मालकीची होती. सद्यस्थितीमध्ये वीजबिलही त्यांच्याच नावावर आहे. त्यांनी ही सदनिका दोन वर्षांपूर्वी विकली. ज्यांनी विकत घेतली त्यांनीही तक्रारींना कंटाळून ती जैन यांना विकली. जैन यांनी कोणतेही अतिक्रमण केले नसताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्रशासन दक्ष असेल तर त्यांनी सदनिका अंबादे यांच्या मालकीची असताना का कारवाई केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.