बेवारस मृतदेहांचा मनपा शवागारावर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:57 IST2017-07-27T01:57:08+5:302017-07-27T01:57:10+5:30
पनवेल व उरण परिसरामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी सुविधाच नाही. यामुळे बेवारस मृतदेह नवी मुंबई महापालिकेच्या शवागारामध्ये ठेवावे लागत आहेत.

बेवारस मृतदेहांचा मनपा शवागारावर ताण
नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेल व उरण परिसरामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी सुविधाच नाही. यामुळे बेवारस मृतदेह नवी मुंबई महापालिकेच्या शवागारामध्ये ठेवावे लागत आहेत. ४८ची क्षमता असताना, प्रत्यक्षात ५५ ते ६० शव ठेवले जात आहेत. ओळख न पटलेले मृतदेह अनेक महिने येथेच ठेवावे लागत असल्याने रुग्णालयाच्या यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाविषयी वारंवार टीका होत असते. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्येही नगरसेवक वारंवार आवाज उठवीत असतात. नागरी आरोग्य केंद्र, माताबाल रुग्णालय ते प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या कामकाजाविषयी आक्षेप घेतले जातात. शवविच्छेदन विभागाच्या कामकाजाविषयी फारशी टीका केली जात नाही. वेळेत शवविच्छेदन करण्यापासून मृतदेह व्यवस्थित ठेवण्यापर्यंत सर्व कामे चांगली करण्यासाठी येथील यंत्रणा तत्पर असते; परंतु सद्यस्थितीमध्ये शवागारामध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे.
रुग्णालयामध्ये ४८ शव ठेवण्यासाठीची सुविधा आहे; परंतु २६ जुलैला येथे ठेवलेल्या मृतदेहांची संख्या ५५ एवढी होती. ही संख्या ६० ते ७० पर्यंतही जात असते. महानगरपालिका रुग्णालयातील शव ठेवण्याची व्यवस्था पालिका क्षेत्रासाठी पुरेशी आहे; परंतु मनपा क्षेत्राबाहेरून पनवेल व उरण परिसरातील बेवारस मृतदेहही मनपा रुग्णालयामध्ये पाठविण्यात येत आहेत. एनआरआय व उरण परिसरामध्ये खाडीमध्ये मृतदेह सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. ते सर्व मृतदेह मनपा रुग्णालयात पाठविण्यात येतात. माणुसकीच्या भावनेमधून त्यांना ठेवून घ्यावे लागत असून, त्यामुळे येथील यंत्रणेवरील ताण वाढत आहे.
पनवेलमध्ये महापालिकेची स्थापना झाली आहे. पालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रामधील मृतदेह ठेवण्यासाठी शवागाराची निर्मिती करणे आवश्यक आहे. उरणमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या रुग्णालयामध्येही शवागार असणे, आवश्यक आहे. जोपर्यंत पनवेल व उरणमध्ये शवागाराची सुविधा उपलब्ध केली जाणार नाही, तोपर्यंत नवी मुंबई महापालिका रुग्णालयावरील ताण कमी होणार नाही. शवागारामध्ये ठेवलेल्या मृतदेहाची काळजी घ्यावी लागते. तेथील तापमान ३ ते ५ डिग्री सेल्सिअस अंश एवढे ठेवावे लागते. मृतदेह ठेवण्यासाठी ४८ रॅक आहेत. या व्यतिरिक्त मृतदेह आल्यास त्यांना जमिनीवर ठेवावे लागत आहे. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलीस, नातेवाईक आल्यानंतर व कर्मचारी कामानिमित्त येथे वावरत असताना त्यांची गैरसोय होत
आहे.
अशीच स्थिती राहिली व एखादी मोठी दुर्घटना घडल्यास मृतदेह ठेवण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही व मृतदेहांची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील कर्मचाºयांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने रायगड जिल्हा परिषद, पनवेल महापालिका व परिमंडळ दोनचे पोलीस अधिकारी यांना मृतदेह ठेवण्यासाठी सुविधा करण्यासाठीची सूचना दिली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पालिकेतील डॉक्टरांची दक्षता
पनवेल ग्रामीण रूग्णालयामध्ये शवविच्छेदन व मृतदेह ठेवण्याची योग्य सुविधा नसल्याने अनेक वेळा प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला आहे.
राज्यात इतर ठिकाणी शवविच्छेदन, शवागृहाविषयी आवाज उठविला जातो; पण नवी मुंबई महापालिकेमधील डॉक्टर व कर्मचारी दक्षपणे कामकाज करत असल्याने आतापर्यंत कधीही टीकेला सामोरे जावे लागलेले नाही.
शवविच्छेदन अधिकारी डॉ. भूषण जैन व त्यांचे सहकारी वेळेवर व योग्यपद्धतीने काम करत आहेत. यामुळे नागरिकांनीही त्यांच्याविषयी कधीच तक्रारी केलेल्या नाहीत.
बेवारस मृतदेहांमुळे रूग्णालयावरील ताण वाढत असून याविषयी वेळेत मार्ग काढणे गरजेचे झाले आहे.