डेरवलीत रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: August 31, 2016 03:34 IST2016-08-31T03:34:15+5:302016-08-31T03:34:15+5:30
तालुक्यात स्वच्छता अभियान व आपत्ती नियंत्रणावर योग्य व्यवस्थापन होत असताना डेरवलीतील रहिवासी मात्र समस्यांमुळे त्रस्त आहेत.

डेरवलीत रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
कळंबोली : तालुक्यात स्वच्छता अभियान व आपत्ती नियंत्रणावर योग्य व्यवस्थापन होत असताना डेरवलीतील रहिवासी मात्र समस्यांमुळे त्रस्त आहेत. याठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या असल्या तरी मूलभूत सुविधांअभावी रहिवासी त्रस्त आहेत. सांडपाण्याबरोेबर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्याने अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. सर्वत्र दलदल पसरल्याने डासांचा प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
इमारतींच्या आवारात गुडघाभर पाणी साचल्याने येता-जाताना रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत वारंवार तक्र ारी करून संबंधित प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सिडको वसाहतीत जागा शिल्लक नसल्याने आजूबाजूच्या गावात बांधकाम व्यावसायिकांनी इमारती उभारल्या. मात्र याठिकाणी ना रस्ते, ना सांडपाण्यासाठी व्यवस्था, ना कचरा विल्हेवाटीची व्यवस्था. पावसाळी नाले तर योग्यरीत्या याठिकाणी बांधण्यात आलेलेच नाहीत.
उसर्ली- डेरवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीत डेरवली गावात जवळपास पन्नास इमारती उभारण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने आराखडे मंजूर करताना योग्य नियोजन केले नाही.
सिध्दिविनायक, सिध्दी, श्रेया, ओमसाईधाम, पद्मावती, सिल्व्हर, गोकूळ, ज्योतीर्लिंग, मानसी यासारख्या एकूण बारा ते तेरा अपार्टमेंटमध्ये राहणारे रहिवासी याठिकाणी घरे घेऊन पश्चाताप करीत आहेत. एकूण ११२६ सदनिका असून साडेचार हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता दीर्घकालीन व्यवस्था नाही. बाजूला अरुंद गटारे तयार केली असली तरी मान्सूनपूर्व सफाई झाली नसल्याने पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नाही.
काही इमारतीच्या पार्र्किं गमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. इंजीन व सायलेन्सरमध्ये पाणी जावून वाहने बंद पडत असल्याचे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पाणी साचत असल्याने सिलिंडरची गाडी अथवा स्कूल व्हॅन सोसायटीत येत नसल्याचे येथील रहिवासी दिलीप धावत्रे सांगतात.
ग्रामपंचायतीकडून प्रति सदनिका १२०० रुपये घरपट्टी आकारली जाते, मात्र तुलनेने काहीच सुविधा पुरविल्या जात नाहीत. रहिवाशांकडून वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. साचलेले पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जात असल्याने साथीचे आजार बळावले आहेत.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे सुमारे चार हजार रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात तहसीलदार दीपक आकडे यांच्याशी संपर्कसाधला असता, हा विषय गटविकास अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत असल्याने तेच याबाबत कार्यवाही करतील, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)