‘त्या’ कनिष्ठ अभियंत्यांची सेनेकडून दखल
By Admin | Updated: January 8, 2015 01:51 IST2015-01-08T01:51:29+5:302015-01-08T01:51:29+5:30
१० कनिष्ठ अभियंत्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आज शिवसेनेकडून त्याची दखल घेण्यात आली़ आयुक्तांना याप्रकरणी थेट पत्र देऊन शिवसेनेचे गटनेते दिलीप गुळवी यांनी जाब विचारला़

‘त्या’ कनिष्ठ अभियंत्यांची सेनेकडून दखल
मुंबई : भिवंडी महानगरपालिकेच्या सेवेत रुजू होऊन आठ वर्षे लोटली तरी ना पदोन्नती, ना पगारवाढ अशी स्थिती असणाऱ्या १० कनिष्ठ अभियंत्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आज शिवसेनेकडून त्याची दखल घेण्यात आली़ आयुक्तांना याप्रकरणी थेट पत्र देऊन शिवसेनेचे गटनेते दिलीप गुळवी यांनी जाब विचारला़
महापालिकेच्या सेवेत जून २००७ पासून बी. ई. सिव्हिल व डिप्लोमा इंजिनीअर ही शैक्षणिक पात्रता असणारे एकूण १० कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. आठ वर्षे होऊनही त्यांना कोणतीही पदोन्नती व त्यानुसार पगारवाढ मिळालेली नाही. मात्र याच आस्थापनेत १९९९ साली एक खास ठराव घेऊन कार्यरत असणाऱ्या इतर पाच कनिष्ठ अभियंत्यांना पाच वर्षे सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर ‘शाखा अभियंता वर्ग २’ म्हणून पदोन्नती व पगारवाढ देण्यात आली आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने दिनांक ५ जानेवारी रोजी सोमवारी वृत्त दिले होते.
‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, आज शिवसेना गटनेते दिलीप गुळवी यांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन आस्थापनेत १९९९ साली एक खास ठराव घेऊन कार्यरत असणाऱ्या इतर पाच कनिष्ठ अभियंत्यांना पाच वर्षे सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर ‘शाखा अभियंता वर्ग-२’ म्हणून पदोन्नती व पगारवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही वेळोवेळी पात्र कनिष्ठ अभियंत्यांना सुद्धा हेच निकष लावण्यात आले. मात्र २००७ च्या बॅचला वर्ग २च्या पदोन्नती व वेतनवाढीपासून का वंचित ठेवले, असा जाब विचारला आहे. (प्रतिनिधी)