आंदोलनांचे अर्धशतक!
By Admin | Updated: June 16, 2014 02:53 IST2014-06-16T02:53:20+5:302014-06-16T02:53:20+5:30
‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा...’ अशा नानाविध घोषणांनी गेल्या काही दिवसांत दुमदुमलेल्या आझाद मैदानात रविवारी मात्र स्मशानशांतता होती

आंदोलनांचे अर्धशतक!
चेतन ननावरे, मुंबई
‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय...’, ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा...’ अशा नानाविध घोषणांनी गेल्या काही दिवसांत दुमदुमलेल्या आझाद मैदानात रविवारी मात्र स्मशानशांतता होती. शनिवारी सूप वाजलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या १२ दिवसांत नव्या ५७ आंदोलकांनी याठिकाणी धडक देत आपल्या मागण्या लावून धरल्या.
बाराही महिने राज्यातील विविध जिल्हे आणि तालुक्यांतून विविध प्रवर्गातील व्यक्ती आणि संघटना मागण्या घेऊन आझाद मैदानावर धडकत असतात. मात्र अधिवेशन काळात येथे होणाऱ्या आंदोलनांच्या संख्येत प्रचंड वाढ होते. आंदोलकांमुळे झालेल्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते. अधिवेशन काळात प्रत्येक खात्याचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी हे मंत्रालयात एकाच वेळी भेटतात. त्यामुळे मागण्यांवर सविस्त चर्चा करून काही महत्त्वाचे निर्णय पदरात पाडून घेता येतील, अशी भाबडी आशा आंदोलकांच्या मनात असते. त्यामुळे आपली सर्व ताकद पणाला लावून हजारोंच्या संख्येने धडक देण्याचा आंदोलकांचा प्रयत्न असतो.
यंदा २ जून ते १४ जूनदरम्यान पार पडलेल्या १२ दिवसांच्या अधिवेशन काळात एकूण ५७ नव्या आंदोलकांनी विविध आंदोलनांद्वारे आझाद मैदानावर हजेरी लावली. त्यात धरणे, निदर्शने, एकदिवसीय आणि बेमुदत उपोषण अशा विविध आंदोलनांचा समावेश होता. यंदा आंदोलनांची हाफ सेंच्युरी जरी पूर्ण झाली असली, तरी तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणंका पाहता हा आकडा फारच कमी मानला जात आहे.