करवाढीचा निर्णय अन् सभाही बेकायदेशीर?
By Admin | Updated: January 8, 2015 22:47 IST2015-01-08T22:47:22+5:302015-01-08T22:47:22+5:30
कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या मालमत्ता धारकांना लादण्यात येणाऱ्या करप्रणालीवर निर्णय घेण्यासाठी बोलाविलेली विशेष सभा ही बेकायदेशीर ठरणार आहे.

करवाढीचा निर्णय अन् सभाही बेकायदेशीर?
पंकज पाटील ल्ल बदलापूर
कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या मालमत्ता धारकांना लादण्यात येणाऱ्या करप्रणालीवर निर्णय घेण्यासाठी बोलाविलेली विशेष सभा ही बेकायदेशीर ठरणार आहे. कारण सभेची वेळ ही दुपारी दोनची असतांना ती दोन वाजता सुरु न करता एक तास आधीच सुरु करण्यात आली. तसेच या सभेत ३४ महत्वपूर्ण विषयांना सभेत मंजुरीही घेण्यात आली. सभेची वेळ दोनची ठरविण्यात आलेली असतांनाही मुख्याधिकाऱ्यांनी ती एक तास आधी म्हणजे १ वाजता कशी सुरु केली हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिकेची अर्थसंकल्पीय सभा २९ डिसेंबर २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता आयोजिली होती. त्याच दिवशी दुपारी २ वाजता काही महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी दुसऱ्या एका विषेश सभेचे आयोजन केले होते. या सभेत मालमत्तांचे करपात्र मुल्यांमध्ये सुधारणा करण्याचा विषय घेण्यात आला होता. सोबत कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या हद्द वाढीचा प्रस्ताव, जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा योजना पालिकेच्या ताब्यात घेणे, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घनकचरा हाताळणी शुल्कात १० टक्के वाढ करणे, उल्हास नदी संवर्धन प्रकल्प हाती घेणे आणि भुयारी गटार योजनेसाठी वाढीव कर्जासाठी मंजूर घेणे या महत्वपूर्ण विषयांसोबत ३४ विषय चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी विषय पत्रिकेत होते. एकाच दिवशी दोन सभा असल्याने नगरसेवकांची संख्याही सभागृहात बऱ्यापैकी होती. योगायोगाने अर्थसंकल्पावरील सभा ही जास्त वेळ न चालल्याने ती सभा दुपारी १ च्या आतच आटोपली. या सभेत अर्थसंकल्प मंजूरही झाला. यानंतर दुपारी २ वाजता ठेवलेल्या विशेष सभेला तासभर थांबावे लागणार म्हणून उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकत्रित निर्णय घेऊन दुपारची सभा एक तास आधीच म्हणजे १ वाजता सुरु केली. ह्या सभेत करपात्र मूल्यांमध्ये सुधाणा करण्याच्या विषयावरच सविस्तर चर्चा करण्यात आली. उर्वरीत सर्व विषयांवर किरकोळ चर्चा करुन ३४ विषय मंजूर करुन दुपारी २ च्या आतच ती आटोपण्यात आली. विशेष सभेची वेळ दोनची असतांनाही ती एक वाजता कशी सुरु करावी याबाबत कोणाही नगरसेवकाने त्यावर अक्षेप घेतला नाही. पालिकेत नव्याने दाखल झालेले मुख्याधिकारी देविदास पवार यांनीही नगरसेवकांच्या सुरात सूर मिळवित ही सभा सुरु केली. ‘नगरसेवक राजी तो क्या करेगा सीओ काजी ’ अशी अवस्था पवार यांची झाली होती. सभेतील चुकीच्या कामकाजावर शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्याधिका-यांनी आक्षेप घेणे क्रमप्राप्त होते. मात्र पवार यांनी मूग गिळून बसणे पसंत केले. तर दुसरीकडे स्वत:ला अभ्यासू नगरसेवक म्हणून मिरवणाऱ्या काही नगरसेवकांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नाही तर काही नगरसेवकांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. विशेष म्हणेज या बेकायदेशीर सभेत करवाढीचा महत्वपूर्ण निर्णय झाल्याने ही अन्यायकारक कर प्रणाली रद्द व्हावी यासाठी पालिकेची ही सभाच बेकायदेशिर ठरविण्यासाठी शहरातील काही नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे काही नगरसेवकांनी नाव न सांगण्याचा अटीवर स्पष्ट केले. या संदर्भात मुख्याधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पाची सभा लवकर संपल्याने दुसरी सभा एक तास आधी सुरु करण्यात आली. कोणत्या नगरसेवकाची तक्रार आली असती तर या सभेसंदर्भात आपण योग्य ती कार्यवाही केली असती.