मैदानांचे झाले वाहनतळ
By Admin | Updated: February 22, 2016 00:32 IST2016-02-22T00:32:35+5:302016-02-22T00:32:35+5:30
विकासाकडे झेपावणाऱ्या पनवेल शहरात अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. या शहराची सर्वात मोठी समस्या म्हणजे येथील मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. एकीकडे

मैदानांचे झाले वाहनतळ
- वैभव गायकर, पनवेल
विकासाकडे झेपावणाऱ्या पनवेल शहरात अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. या शहराची सर्वात मोठी समस्या म्हणजे येथील मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. एकीकडे आकाशही ठेंगणे पडेल अशा गगनचुंबी इमारती तर त्याच ठिकाणी राहणाऱ्या मुलांना मात्र खेळायला मैदानच नाही. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या या शहराचा विकास झपाट्याने झाला आहे, मात्र आजही प्राथमिक सुविधांपासून शहर वंचित असल्याने शहराचे नाव मलीन होत आहे.
क्रीडा संस्कृती जपण्यासाठी पनवेलमध्ये बांधण्यात आलेल्या मैदानाची सद्यस्थिती पाहता या ठिकाणी साचलेला कचरा, वाहनतळ म्हणून वापरली जाणारी जागा ही वास्तविकता पाहायला मिळते. वर्षातील काही महिने तर खेळाची ही जागा अक्षरश: लग्न समारंभ, मेळावे, राजकीय कार्यक्रमांसाठी वापरली जाते. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली मैदाने, उद्याने मात्र देखभाल, दुरुस्तीअभावी वापराविना पडलेली पाहायला मिळत आहे. सुटीच्या दिवशी मुले रस्त्यावर, गल्लीत जिथे जागा मिळेल तिथे रेल्वे स्थानक परिसरातही खेळताना पाहायला मिळतात. शहराचा वाढत चाललेला विस्तार लक्षात घेता खेळाच्या मैदानांकडे मात्र गांभीर्याने लक्षच घातले जात नाही.
विशेष म्हणजे शहरात गल्लीबोळात देखील वाहनांची वर्दळ असल्याने मुलांना शहराबाहेर खेळण्यासाठी जावे लागत आहे. या परिस्थितीत बदल करण्याची गरज आहे. पनवेल नगरपरिषदेची महानगर पालिकेकडे वाटचाल सुरु आहे. मात्र सर्वच बाबतीत प्रशासन फेल ठरले असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. शहरात मैदानी खेळ खेळण्यासारखे केवळ एक मैदान आहे. पनवेलच्या लोकसंख्येच्या दृष्टीने मैदानांची संख्या जास्त हवी होती. प्रशासनाकडे देखील याबाबत इच्छाशक्ती नसल्याचे, न्यू बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव आशुतोष भिसे यांनी सांगितले. आम्ही सिटीझन युनिट फोरमच्या वतीने अशोक बागेसमोरील मैदानासाठी राखीव असलेले भूखंड विकसित करण्याची मागणी करीत आहोत. मात्र तरी देखील याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा एकूण आराखडा पाहिला असता नगरपरिषदेकडे जागाच शिल्लक नसल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.