प्रामाणिक भाजी विक्रेते होणार विस्थापित!

By Admin | Updated: October 14, 2016 06:56 IST2016-10-14T06:56:05+5:302016-10-14T06:56:05+5:30

महापालिकेने बांधलेल्या मार्केटमधील ओटे वाटपाविषयी फेरीवाल्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जे प्रत्यक्षात व्यवसाय करत नाहीत

Genuine vegetable sellers will be displaced! | प्रामाणिक भाजी विक्रेते होणार विस्थापित!

प्रामाणिक भाजी विक्रेते होणार विस्थापित!

नवी मुंबई : महापालिकेने बांधलेल्या मार्केटमधील ओटे वाटपाविषयी फेरीवाल्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जे प्रत्यक्षात व्यवसाय करत नाहीत त्यांना ओट्यांचे वाटप केले जात आहे. १५ ते २० वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना बेरोजगार केले जात असल्याचे समोर येवू लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने सीबीडी, सीवूड, नेरूळ, सारसोळे, तुर्भे स्टोअर्स, वाशी व इतर ठिकाणी भाजी व मासळी मार्केट बांधले आहेत. मार्केटमधील गाळे व ओटे वाटपाचे धोरण निश्चित झाले नसल्याने अनेक वर्षांपासून मार्केटच्या इमारती वापराविना पडून होत्या. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्केट सुरू करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. पण ओटे वाटपामध्ये फक्त फेरीवाला परवाना नसल्याचे कारण देवून प्रत्यक्षात व्यवसाय करणाऱ्यांना डावलले जावू लागले आहे. गुरूवारी नेरूळ सेक्टर १८ मधील स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे भाजी मार्केटमधील ओट्याचे वाटप करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली. पालिकेच्या पथकाने सकाळीच घटनास्थळी जाऊन रोडच्या बाजूला असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
मार्केटची इमारत बांधताना तेथे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना बाजूच्या भूखंडावर स्थलांतरित केले होते. तेथील भाजी विक्रेत्यांना तेथून जागा खाली करण्याच्या सूचना केल्या आहेत. स्वत: जागा खाली केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. ज्यांच्याकडे फेरीवाल्याचा परवाना आहे त्यांना लॉटरी पद्धतीने मार्केटच्या तळमजल्यावर ओट्यांचे वाटप करण्यात आले. पालिकेने २४ ओटे तयार केले असून १३ ओटेचे वाटप केले आहे. १५ वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्यांना डावलण्यात आले आहे. प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या पाच जणांनाच तेथे ओटे मिळाले आहेत.
महापालिकेने मार्केट बांधण्यास सुरुवात केली तेव्हा तेथे प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या सर्व भाजी विक्रेत्यांना नोटीस दिली होती. मार्केटचे बांधकाम झाल्यानंतर सर्वांना ओटे दिले जातील असे आश्वासनही दिले होते. बाजूच्या मोकळ्या भूखंडावर तात्पुरती व्यवस्थाही केली होती. पण प्रत्यक्ष मार्केटचे बांधकाम झाल्यानंतर जे व्यवसाय करत आहेत त्यांना फक्त परवाना नसल्याचे कारण देवून विस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांमध्ये जागा खाली करावी लागणार असल्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागणार आहे. नेरूळप्रमाणेच इतर ठिकाणीही फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेने फेरीवाला परवाना देणे बंद केले आहे. नागरिकांनी परवान्यासाठी अर्ज करूनही त्यांना परवानगी दिली नाही व आता परवानगी नसल्याने कारवाई केली जात असल्याबद्दल फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Genuine vegetable sellers will be displaced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.