गौरी-गणपतीला निरोप
By Admin | Updated: September 22, 2015 03:54 IST2015-09-22T03:54:09+5:302015-09-22T03:54:09+5:30
सोमवारी पाच दिवसांची स्थापना केलेल्या गणरायाला गौरीसह निरोप देण्यात आला. आगमनापासून घरचा सदस्य झालेल्या गणरायालाय निरोप देताना गणेशभक्तांचे मन भरून आले होते

गौरी-गणपतीला निरोप
नवी मुंबई : सोमवारी पाच दिवसांची स्थापना केलेल्या गणरायाला गौरीसह निरोप देण्यात आला. आगमनापासून घरचा सदस्य झालेल्या गणरायालाय निरोप देताना गणेशभक्तांचे मन भरून आले होते. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्वच विसर्जन स्थळांवर गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.
गुरुवारपासून शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा होत आहे. त्यानुसार घरी तसेच मंडळात स्थापन झालेल्या गणेशमूर्तीची भक्तांकडून मनोभावे सेवा केली जात आहे. त्यामुळे सोमवारी गौरीसोबत विसर्जन होणाऱ्या पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देताना गणेशभक्तांचे डोळे भरून आले होते. पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज होते. या वेळी महापालिका क्षेत्रात २३ ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. मोठ्या मूर्तींसाठी फोर्कलिफ्ट, तराफे यांची सोय करण्यात आली होती तर मूर्तीच्या विसर्जनासाठी सर्वच ठिकाणी स्वयंसेवकही नेमण्यात आले होते. तलावांच्या ठिकाणी गर्दी टळावी यासाठी बॅरिकेटिंग करून त्या ठिकाणी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. भक्तांना पिण्यासाठी पाणी तसेच प्रथमोपचाराचीही सोयदेखील करण्यात आली होती. विसर्जनासाठी केलेली व्यवस्था चोख आहे का हे तपासण्यासाठी पालिका आयुक्त उपआयुक्त तसेच पोलीस आयुक्त व सर्वच उपआयुक्त ठिकठिकाणी भेटी देत होते. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता दुपारपासूनच त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय विसर्जनमार्गासह विसर्जन स्थळावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून हालचालींवर नजर ठेवण्यात आली. पाचव्या दिवशी विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्तींमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचा समावेश असतो. त्यानुसार वाजतगाजत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यायला विसर्जन स्थळापर्यंत गणेशभक्त धाव घेत होते. काहींनी तर केवळ श्रीगणेशाच्या दर्शनासाठी विसर्जन स्थळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मध्यरात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.
१उरण शहरातून सुमारे ३५० खासगी गौरी - गणपतींचे उनपच्या विमला तलावात विसर्जन करण्यात आले. उनपनेही गणपती विसर्जनादरम्यान संपूर्ण विमला तलावात विद्युतरोशणाई करून विसर्जनासाठी येणाऱ्यांसाठी स्वागताची जय्यत तयारी केली होती.
२ग्रामीण भागातील अनेक गणपतींचे विसर्जन केगाव हद्दीतील माणकेश्वर - दांडा समुद्रकिनारा, पीरवाडी समुद्रात करण्यात आले. माणकेश्वर - दांडा, पीरवाडी समुद्रात दुपारी ३ वाजल्यापासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती. मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच दिवसांच्या गौरी - गणेशमूर्तींचे भवरा तलाव, घारापुरी - मोरा समुद्रात विसर्जन केले.
३जेएनपीटी तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गणेशमूर्तीचे गाव तलावात विसर्जन करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात झालेल्या गौरी - गणपती विसर्जनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने विसर्जन सोहळा शांततेत पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोठीवली ग्रामस्थांनी पारंपरिक प्रथेचे जतन करत गावातील सुमारे ६५ घरगुती गणेशमूर्तींचे एकत्रित विसर्जन केले. मागील तीन दशकांपासून गोठीवली ग्रामस्थ मंडळाकडून दीड व पाच दिवसांच्या विसर्जनात ही प्रथा जोपासली जात आहे. या वेळी टाळ-मृदुंगांच्या तालावर भजन म्हणत गणरायाला निरोप देण्यात आला. त्यानुसार विसर्जनापूर्वीची महाआरतीदेखील एकत्रितच घेऊन गोठीवली ग्रामस्थांनी आदर्श निर्माण केला.