गॅस कंपनीच्या कारभाराचा बसतोय ग्राहकांना फटका
By Admin | Updated: October 11, 2015 00:57 IST2015-10-11T00:57:40+5:302015-10-11T00:57:40+5:30
घणसोली परिसरात पाइपद्वारे गॅसपुरवठा करणाऱ्या गॅस कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा नागरिकांना फटका बसत आहे. बिल भरणा करायची अंतिम मुदत संपल्यानंतर

गॅस कंपनीच्या कारभाराचा बसतोय ग्राहकांना फटका
नवी मुंबई : घणसोली परिसरात पाइपद्वारे गॅसपुरवठा करणाऱ्या गॅस कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा नागरिकांना फटका बसत आहे. बिल भरणा करायची अंतिम मुदत संपल्यानंतर ग्राहकांना बिले पाठवली जात आहेत. यामुळे बिलभरणा करताना ग्राहकांना १०० रुपये जादा मोजावे लागत आहेत.
घणसोली परिसरात सध्या पाइपद्वारे ग्राहकांना गॅसपुरवठा होत आहे. त्यानुसार या गॅस ग्राहकांना दोन महिन्यांनी त्यांनी वापरलेल्या गॅसचे बिल पाठवण्यात येते. मात्र काही महिन्यांपासून महानगरच्या गॅस कंपनीच्या बिल वितरणात अनागोंदी कारभार सुरू आहे. बिलाची रक्कम भरणा करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर त्यांना बिलाची प्रत घरपोच होत आहे. मागील काही महिन्यांपासून घणसोली परिसरात हा प्रकार सुरू असल्याची गॅस ग्राहकांची तक्रार आहे. यामुळे उशिरा मिळालेल्या बिलाच्या रकमेचा भरणा करण्यासाठी संबंधित केंद्रावर गेलेल्या ग्राहकांचे तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत वाद होत आहेत. कंपनीकडूनच बिल उशिरा मिळाल्याचे सांगूनही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये गॅस कंपनीविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. विजबिल वाटपात होणाऱ्या विलंबाचा फटका गॅस ग्राहकांना बसत असल्याची तक्रारदेखील घणसोली सिम्पलेक्स येथील ओम साई धाम सोसायटीने महानगर गॅस कंपनीला केली आहे. मात्र त्यानंतरही गॅस कंपनीकडून हा अनागोंदी कारभार सुरूच असल्याचा संताप सोसायटीचे पदाधिकारी भरत चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. याबाबत महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)