मंदिरांचे अस्तित्वही सिद्ध करावे लागणार !
By Admin | Updated: July 3, 2016 03:32 IST2016-07-03T03:32:28+5:302016-07-03T03:32:28+5:30
सिडको कार्यक्षेत्रामधील प्रकल्पग्रस्तांच्या मंदिरांनाही अतिक्रमण विभागाने नोटिस दिल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. चार दशके न्यायहक्कांसाठी संघर्ष

मंदिरांचे अस्तित्वही सिद्ध करावे लागणार !
- नामदेव मोरे, वैभव गायकर, नवी मुंबई
सिडको कार्यक्षेत्रामधील प्रकल्पग्रस्तांच्या मंदिरांनाही अतिक्रमण विभागाने नोटिस दिल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. चार दशके न्यायहक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भूमिपुत्रांना आता ग्रामदेवतांचे अस्तित्वही सिद्ध करावे लागणार आहे. जमिनी घेतल्या, घरांवर कारवाई होत आहे आणि आता देवळेही पाडणार का, असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला आहे.
नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर वसविण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी त्यांच्या शंभर टक्के जमिनीचा त्याग केला आहे. सिडकोने शहराचे नियोजन केले, परंतु मूळ गावठाणांना एका ठरावीक क्षेत्रफळात बंदिस्त केले. यामुळे गावांची अवस्था झोपडपट्टीपेक्षाही बिकट झाली आहे. प्रकल्पग्रस्त ४५ वर्षांपासून न्यायहक्कांसाठी संघर्ष करीत असून, त्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच आहेत. आतापर्यंत सिडको गरजेपोटी बांधलेल्या घरांवर बुलडोजर फिरवत होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे येऊन करोडो रुपयांच्या भूखंडांवर अनधिकृत झोपड्या उभारणाऱ्या खऱ्या भूमाफियांना मानाची वागणूक दिली जात असून, भूमिपुत्रांनाच भूमाफियांची उपाधी दिली जात आहे. त्यांच्याच भूमीतून त्यांना बेघर केले जात आहे. आतापर्यंत घरांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या ग्रामदेवतांची मंदिरे वाचविण्यासाठीही संघर्ष करण्याची वेळ आली आहे. सिडकोने अनेक गावांमधील जुन्या मंदिरांनाही अतिक्रमणाच्या नोटिसा दिल्या आहेत. वास्तविक जुलै २०१५ मध्ये नोटिसा तयार केल्या असून, मागील काही महिन्यांपासून त्यांचे वितरण सुरू केले आहे. एक महिन्यात मंदिर पाडून टाकावे, नाहीतर सिडको कारवाई करेल, असा इशारा देण्यात आला आहे. मंदिरांना आलेल्या नोटिसीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोठीवली, घणसोली, मुरबी, पेठ, करावे व इतर अनेक ठिकाणी अशाप्रकारच्या नोटिसा आल्या आहेत. ग्रामस्थांनी याविषयी बैठका घेऊन सिडकोच्या नोटिसांचा निषेध केला आहे.
गावदेवी मंदिर व गावदेवी तलाव ही नवी मुंबईमधील सर्व गावांची खरी ओळख आहे. सिडकोने जमीन संपादिीा केलेल्या ९५ गावांमध्ये अनेक पुरातन मंदिरेही आहेत. वाशीमधील जागृतेश्वर, पावणेमधील पावणेश्वर, सानपाडामधील दत्तमंदिर, खारघरमधील देवाळेश्वर यांच्यासह अनेक मंदिरांमध्ये ठाणे व रायगड जिल्ह्यांमधून भाविक येत असतात. प्रत्येक गावामध्ये वर्षभर धार्मिक कार्यक्रम, भजन व कीर्तन होत असते. पूर्ण शहरीकरण झाल्यानंतरही ग्रामस्थांनी गावदेवी यात्रांची परंपरा कायम ठेवली आहे. यात्रांसाठी हजारो भाविक येत असतात. दिवाळे गावामधील भैरीनाथ देवाची यात्रा दिवाळीमध्ये असते. समुद्रामध्ये असलेली देवाची मूर्ती या दिवशी ग्रामस्थ समुद्रमंथन करून शोधतात व ती यात्रेसाठी गावात आणली जाते. अशाप्रकारे धार्मिक परंपरा असणाऱ्या मंदिरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मंदिर परिसरात यात्रा, कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी भूखंड राखीव ठेवणे आवश्यक आहे.
काय आहे नोटीस ?
महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९६६ अन्वये ३२ दिवसांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम स्वत: निष्कासित करून जमीन ज्या स्थितीमध्ये होती त्या स्थितीमध्ये आणून ठेवावी. जर ३२ दिवसांमध्ये स्वत:हून अनधिकृत बांधकामे काढून टाकले नाही तर कायद्याच्या कलम ५३ खाली अधिकाराचा वापर करून संबंधित बांधकाम पाडण्यात येईल किंवा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा १९६६ च्या कलम क्रमांक ५३ (६) अ खाली फौजदारी कोर्टात आपल्या विरोधात फिर्याद करण्यास कलम ५३ (७) अन्वये पात्र व्हाल, तसेच कारवाईचा खर्चही वसूल केला जाईल.
भूमिपुत्रांच्या देवांवरही अन्याय
सिडकोने शहरात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांसाठी तब्बल १५२ भूखंडांचे वितरण केले आहे. यामध्ये फक्त नेरूळमधील ग्रामदेवता मंदिर ट्रस्टला १,३३४ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड दिला आहे. गावदेवी मंदिरासाठी एवढ्याच अधिकृत भूखंडाचा उल्लेख दिसत आहे. गावदेवी मंदिराला १,३३४ चौरस मीटरचा भूखंड दिला असताना सिडको कार्यक्षेत्रामध्ये काही मंदिरांना तब्बल ९ हजार चौरस मीटरचे भूखंड दिले आहेत. आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला जात होता. आता त्यांच्या देवतांवरही अन्याय होऊ लागला आहे.
१०० वर्षांची परंपरा
घणसोली गावामधील मंदिरांना १०० वर्षांपेक्षा जास्त धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इंग्रजांनी जमावबंदी जाहीर केल्यानंतर ग्रामस्थांनी गोकूळाष्टमी महोत्सवामध्ये ८ दिवस चोवीस तास भजन करण्याची प्रथा सुरू केली असून, ती अद्याप सुरूच आहे. तुर्भेमधील रामतनू व इतर अनेक मंदिरांना पुरातन पार्श्वभूमी आहे.
यात्रा करायच्या तरी कुठे ?
जागृतेश्वर मंदिर, सानपाडा दत्तमंदिर, नेरूळ गावदेवी मंदिर व इतर काही ठिकाणी मंदिराच्या परिसरात मोकळी जागा आहे. परंतु ते भूखंड प्रत्यक्षात मंदिर ट्रस्टच्या नावावर करण्यात आलेले नाहीत. इतर अनेक ठिकाणी मंदिराच्या परिसरात जागाच नाही. जुहूगावचे मरिआई मंदिर रोडच्या मध्यभागी आहे. मंदिरासाठी व परिसरात जागाच नसल्याने यात्रा, कीर्तन व इतर कार्यक्रम करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.