ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू

By Admin | Updated: June 2, 2017 05:52 IST2017-06-02T05:52:45+5:302017-06-02T05:52:45+5:30

जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाला सुरुवात

Electricity in rural areas continues | ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाला सुरुवात होणार असल्याने एमएसईबीने विजेच्या तारा, ट्रान्सफॉर्मर नव्याने टाकले आहेत; परंतु काही ठिकाणचे सडलेले विजेचे पोल बदलण्यात त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
विजेच्या सततच्या हुलकावणीने मुरुड तालुक्यातील संतप्त नागरिकांनी वीज मंडळाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. अलिबाग तालुक्यामध्येही विजेचा सातत्याने लंपडाव सुरू आहे. कोणत्याही क्षणी वीज जाते. त्यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वीज गेली तर, रात्र जागूनच काढावी लागत आहे, ही परिस्थिती सातत्याने उद्भवत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
पावसाळ््यापूर्वीची तयारी म्हणून वीज मंडळाने खराब झालेले डीपी, तारा यांची दुरुस्ती करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्या कालावधीत वीजपुरवठा बंद करावा लागतो. तालुक्यातील अलिबाग शहर, उसर, रामराज, रेवदंडा या पट्ट्यातील सुमारे १० किलोमीटरच्या विजेच्या तारा बदलल्या आहेत. त्याचप्रमाणे नऊ ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर नव्याने बसविण्यात आले आहेत. विजेच्या तारांवर लोंबकळणारी झाडे, त्यांच्या फांद्या याचीही तोड केली आहे. हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ््यापूर्वीच्या कामांची तयारी पूर्ण झाली आहे. उपअभियंता तनपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना
सांगितले.

बारणे गावात विद्युत वाहिन्या धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील बारणे गावात रस्त्याच्या मधोमध विद्युत वाहिन्या धोकादायक असून, येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे; परंतु महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सावेळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत बारणे गाव असून, या गावात मुख्य रस्त्यावर ट्रान्सफार्मरच्या बाजूला विद्युत वाहिन्या झाडाला लटकल्या आहेत. तर काही ठिकाणी विद्युत वाहिन्या एकमेकांना स्पर्श होऊ नये म्हणून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. विद्युत वाहिन्यांना दगडाने दोरी लटकवून ठेवल्या आहेत. त्या कधीही तुटण्याची शक्यता असल्याने महावितरणचे अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने सोसाट्याच्या वाऱ्यात या विद्युत वाहिन्या तुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तसेच या रस्त्याच्या कडेला असलेली डीपीही नेहमी उघडी असते. येथून अनेक लहान मुले, नागरिक ये-जा करत असतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. येथील लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या लवकर बदलण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

बारणे गावातील रस्त्यावर विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. तर काही ठिकाणी झाडाला लटकवून ठेवण्यात आल्या आहे. पावसाळा तोंडावर आल्याने येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महावितरणने या विद्युत वाहिन्या चांगल्या दर्जाच्या कराव्यात, अन्यथा येथे अपघात घडल्यास महावितरणला जबाबदार धरण्यात येईल.
- चंद्रकांत ठोंबरे, ग्रामस्थ, बारणे

कर्जत तालुक्यात समस्यांचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : पावसाळा तोंडावर आला असताना, कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत वाहिन्या लोंबकळत असून, अनेक ठिकाणी डीपी उघड्या, तर अनेक गावांमध्ये विजेचे सडलेले पोल तग धरून उभे आहेत. अशा अनेक समस्या कर्जत तालुक्यातील गावांमध्ये आहेत. अनेक ठिकाणी महावितरणाची कामे सुरू असली तरी काही ग्रामीण भागाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
दोन दिवसांपूर्वी पोशीर चिकनपाडा येथे मुख्य विद्युत वाहिन्या एकमेकांना चिकटल्याने मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आणि अनेकांचे मोटर, फ्रिज, ट्यूब जळाले आहेत. याची तक्र ार देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांचे अर्जदेखील कळंब येथील कर्मचाऱ्यांनी स्वीकारले नाहीत. त्यामुळे या ग्रामस्थांना कर्जत येथील कार्यालयात जावे लागले.

समस्या सोडवा

पोशीर, माले, देवपाडा, शेळू, चिकनपाडा, डिकसळ, नेरळ अशा अनेक गावांमध्ये विजेचे पोल धोकादायक अवस्थेत आहेत, असे असताना आणि पावसाळा तोंडावर आला असताना, महावितरणचे अधिकारी मात्र आपली खुर्ची सोडायला तयार नाहीत, मग या गावांमधील समस्या या अधिकाऱ्यांना कशा कळणार? असे नागरिकांचे म्हणणे असून अधिकाऱ्यांनी या सर्व गावांतील समस्यांची पाहणी करून समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.

कोळे, केलटे परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त; दोन-दोन दिवस वीज गायब

१म्हसळा : तालुक्यात पावसाने दमदार सुरु वात करत गरमीपासून दिलासा दिला. मात्र, दुसरीकडे वीज वितरणचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. म्हसळा तालुक्यातील केलटे, कोळे परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने त्या परिसरातील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एकदा का दिवसा वीज गेली की, ती दुसऱ्या दिवशी येते, अन्यथा दोन-तीन दिवस गायब असते. वीज मंडळाने आपला गलथान कारभार सुधारावा, अन्यथा या विभागातील जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल, असा इशारा कोळे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल पेंढारी यांनी दिला आहे.

२‘पावसाने जोर पकडल्यापासून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वीज तारांवर झाड पडणे, झुंबर जाणे, तारा तुटणे अशा अनेक कारणांमुळे या परिसरातील वीज जात असल्याची माहिती वीज अधिकारी जनतेला देत आहेत; परंतु पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी करावयाची कामे करण्याच्या नावाने वीज घालविण्यात येत होती. मात्र, त्याने फारसा फरक पडलेला दिसत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

३प्रत्येक वर्षी या विभागात पावसाळ्यात विजेचा लपंडाव सुरू असतो; परंतु त्यावर अजून कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. याबाबत महावितरणकडे माहिती विचारली असता, या भागाला श्रीवर्धनमधून वीज देण्यात आली आहे. त्यामुळे तिकडे काही अडचण आली की वीजपुरवठा खंडित होतो, असे उत्तर देण्यात येते. राजकीय पुढारी फक्त मते मागण्यासाठी आम्ही हे करू, ते करू, सांगतात; पण विजेच्या प्रश्नावर आवाज का उठवत नाहीत, असा संतप्त सवाल या विभागातील जनतेकडून केला जात आहे.

वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर या विभागातील विजेचा प्रश्न सोडवावा, अन्यथा म्हसळा तालुका राष्ट्रवादीतर्फे वीज वितरण कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल.
- नाझीम हसवारे,
राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष

Web Title: Electricity in rural areas continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.