महापालिकेकडून विजेची उधळपट्टी
By Admin | Updated: October 8, 2015 23:37 IST2015-10-08T23:37:38+5:302015-10-08T23:37:38+5:30
महापालिकेची शहरात विजेची उधळपट्टी सुरू असून त्यासाठी वर्षाला सुमारे १७ कोटी रुपयांचे बिल भरले जात आहे. भविष्यात विजेचा हा वापर नियंत्रित करण्यासाठी शहरात एलईडी

महापालिकेकडून विजेची उधळपट्टी
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
महापालिकेची शहरात विजेची उधळपट्टी सुरू असून त्यासाठी वर्षाला सुमारे १७ कोटी रुपयांचे बिल भरले जात आहे. भविष्यात विजेचा हा वापर नियंत्रित करण्यासाठी शहरात एलईडी बल्ब बसवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून तो लवकरच महासभेपुढे येणार आहे.
महापालिकेच्या शहरात अनेक वास्तू असून त्या सर्व ठिकाणी होणाऱ्या विजेच्या वापरातून वर्षाला १७ कोटी रुपये वीज बिलाचा भरणा होत आहे. सध्या महापालिकेच्या नव्या मुख्यालयाचेच वीज बिल लाखोच्या घरात आहे. हरित इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालयाच्या इमारतीत नैसर्गिक प्रकाश यायला जागा नसल्याने विजेच्या वापरावर आतमध्ये लखलखाट करण्यात आलेला आहे. तर पांढरा हत्ती समजल्या जाणाऱ्या मलप्रक्रिया केंद्रासाठीही मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत आहे. सहा मलप्रक्रिया केंद्रापैकी ३ केंद्रे मोठी असून इतरही छोट्या स्वरूपातली काही प्रक्रिया केंद्रे आहेत. त्याठिकाणी होणाऱ्या विजेच्या वापरावर यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी गांभीर्य व्यक्त केले होते. त्याशिवाय पाणीपुरवठा केंद्र, सर्व विभाग कार्यालये, नागरी आरोग्य केंद्रे, रुग्णालये, सर्व शाळा, ज्येष्ठ नागरिक केंद्रे, ग्रंथालये व क्रीडा संकुल अशा महापालिकेच्या शेकडो वास्तू आहेत. प्रशासनाकडून या वास्तूचा वापर होत असल्याने त्यांचे वीज बिलही महापालिकेतर्फेच भरले जाते. त्यानुसार वीज बिल स्वरूपात वर्षाला सुमारे १७ कोटी रुपयांचा भरणा महापालिकेकडून महावितरण कंपनीला होत आहे. त्यामध्ये पथदिवे हा देखील महत्त्वाचा भाग आहे.
शहरातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी लख्ख प्रकाश पडावा याकरिता शहरातील मुख्य रस्ते, प्रत्येक विभागातील रस्ते यावर पथदिव्यांची सोय पालिकेच्या विद्युत विभागाने केलेली आहे. परंतु अनेकदा रात्री बंद असणारे हे पथदिवे दिवसा सुरुच असतात. दुरुस्तीचा मोजका काही वेळ वगळता त्यामध्ये अनेकदा विद्युत विभागाचा निष्काळजीपणा दिसून येतो. अशा अनेक प्रकारातून महापालिकेची विजेची उधळपट्टी सुरुच असते. याचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीत जमा रकमेवर होत आहे. नरसेविका रुपाली भगत यांनी स्थायी समिती बैठकीत महापालिकेकडून होणाऱ्या विजेच्या वापराची माहिती मागितली होती. यावेळी विद्युत विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीमधून ही बाब उघड झाली. मात्र भविष्यात विजेच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार पालिकाही एलईडी बल्बचा वापर करणार असल्याचे विद्युत विभागाचे सह शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी सभागृहात सांगितले.
शहरातील पथदिव्यांसह पालिकेच्या सर्व वास्तूंमध्ये विजेची बचत करणारे एलईडी बल्ब बसवले जाणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव बनवण्याचे काम विद्युत विभागामार्फत सुरु असून लवकरच तो महासभेपुढे सादर केला जाईल, असेही राव यांनी भगत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. (प्रतिनिधी)