ऐतिहासिक पर्यटन स्थळाला लागले वाहतूककोंडीचे ग्रहण
By Admin | Updated: March 16, 2017 03:13 IST2017-03-16T03:13:30+5:302017-03-16T03:13:30+5:30
अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा या गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र तरीही पर्यटन क्षेत्र म्हणून सरकारकडून

ऐतिहासिक पर्यटन स्थळाला लागले वाहतूककोंडीचे ग्रहण
अभय आपटे, रेवदंडा
अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा या गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र तरीही पर्यटन क्षेत्र म्हणून सरकारकडून या गावांचा पाहिजे तसा विकास न झाल्याने येथील पर्यटनावर त्याचा परिणाम होत आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी ही येथील गंभीर समस्या आहे.
विस्तीर्ण समुद्रकिनारा, आगरकोट नावाचा वैभवशाली किल्ला, रशियन पहिला प्रवासी भारतात ज्या बंदरात उतरला त्या अफसानी निकितीनचे स्मारक चौल येथे आहे. एकेकाळचे श्रीमंत बंदर म्हणूनही चौल आजही परिचित आहे. ३६० मंदिरे आणि तितकेच तलाव, पुरातन वास्तू, कृषी उत्पादने आणि राजकोटसारखा पुरातन किल्ला, नारळी पोफळीच्या डौलदार बागा, आदी निसर्गरम्य परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो.
अलिबाग शहरापासून सुमारे सतरा कि.मी. अंतरावर असलेल्या रेवदंडा गावाला एकच मुख्य रस्ता असून पुढे कुंडलिका खाडी आहे. १९८५ च्या सुमारास कुंडलिका खाडीवर पूल झाला आणि रोह्यासारखा औद्योगिक वसाहत असलेल्या व प्रति गोवा मानल्या गेलेल्या मुरुड-जंजिरा तालुक्याला अलिबाग जोडले गेले. मात्र अरुंद रस्त्यामुळे रेवदंडा गावात कायम वाहतूककोंडीची समस्या भेडसावते. त्यामुळे स्थानिकांबरोबरच पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
अलिबाग ते रेवदंडा रस्ता म्हणजे या भागातील जीवनवाहिनी म्हटले जाते. मुरुड-जंजिऱ्याला बारमाही पर्यटकांचा राबता असल्याने हा रस्त्यावरही कायम वर्दळ असते. मात्र आपत्काळात, अथवा अपघात घडल्यास जीवनवाहिनी ठप्प होते.
काही वर्षांपूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन रस्त्या रुंदीकरणाकडे लक्ष वेधले होते. पण संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. आक्षी गावापासून ते रेवदंडा आगरकोट हा प्रवास सर्वच वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पर्यटक वाहनांसाठीही रस्ता असुरक्षित बनला आहे. खड्ड्यांचे साम्राज्य, अरुंद रस्ते, धोकादायक वळणे, सूचना फलकांचा अभाव आदींमुळे पर्यटक याठिकाणी येण्याचे टाळतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पर्यटनावरही परिणाम झाला आहे. एसटी, व्होल्वोसारख्या खासगी वाहनांतून जाणारे प्रवासीही जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, तर काही पर्यटक कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र परतीच्या प्रवासाला रोहा मार्ग निवडतात.