दुर्गदुर्गेश्वरला गतवैभव परत मिळणार
By Admin | Updated: June 4, 2017 03:56 IST2017-06-04T03:56:12+5:302017-06-04T03:56:12+5:30
मराठा साम्राज्याची राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने ६०६ कोटी ९ लाख रुपयांची घोषणा केली आहे.

दुर्गदुर्गेश्वरला गतवैभव परत मिळणार
- नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मराठा साम्राज्याची राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने ६०६ कोटी ९ लाख रुपयांची घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी विशेष स्थापत्य पथकाचीही निर्मिती करण्यात आली आहे. शिवसृष्टीसह महामार्गासाठी भूसंपादन व प्रत्यक्ष किल्ला संवर्धनासाठीची कार्यवाही सुरू झाली असून, रायगडला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे.
पाचाडमध्ये २१ जानेवारी, २०१६ मध्ये झालेल्या रायगड महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गड-किल्ल्यांचे गतवैभव परत मिळवून दिले पाहिजे. त्याकरिता किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेतली जाणार असून, पहिल्या टप्प्यात रायगडसह पाच किल्ल्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. किल्ल्यांचा इतिहास जिवंत करून दाखविण्यासाठी शिवसृष्टी सारख्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाशी सामंजस्य करार करून महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संवर्धन व परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर २४ डिसेंबर २०१६ मध्ये अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रायगडसह भारतामधील सर्व किल्ल्यांना भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल, असे स्पष्ट मत व्यक्त केले होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च, २०१७ रोजी झालेल्या बैठकीमध्ये रायगडच्या विकासासाठीच्या ६०६ कोटी ९ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात येणारी कामे. पाचाडमध्ये उभारण्यात येणारी शिवसृष्टी, भूसंपादन, रायगड किल्ला परिसरातील ७ किलोमीटर परिघातील २१ गावे व वाड्यांच्या परिसरात करण्यात येणाऱ्या विकासकामांचा समावेश आहे.
रायगड किल्ला संवर्धनामध्ये महाड ते पाचाड या २५. ५० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासह २५८ कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला असून, तो केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी किल्ल्यावरील नळ पाणीपुरवठा योजनेच्या मजबुतीकरण व दुरुस्तीसह किल्ल्यावरील जिल्हा परिषदेचे विश्रामगृह, इमारतींचे नूतनीकरणाविषयी कामांचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून, भारतीय पुरातत्त्व विभाग, मुंबई सर्कलच्या वतीने दिल्ली कार्यालयाकडे पाठविले आहे.
विभागीय आयुक्तांचेही योगदान
कोकण विभागीय आयुक्तपदी प्रभाकर देशमुख असताना, त्यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठीचा आराखडा तयार करणे व कामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. विशेष स्थापत्य पथक तयार करण्यापासून शिवसृष्टीसह महामार्गासाठी जमीन संपादनाच्या कामातही लक्ष दिले होते. ३१ मे रोजी निवृत्ती होतानाही रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठीचा आराखडा व इतर कामे सुरू करण्यात यश आल्याविषयी समाधान व्यक्त केले होते.
विशेष स्थापत्य पथकाची नियुक्ती
रायगड किल्ला जतन, संवर्धनासाठी शासनाने ६०६ कोटी ९ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चार उपअभियंत्यांचा समावेश असलेल्या विशेष स्थापत्य पथकाची नियुक्ती महाड येथे के ली आहे. एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र बोरसे यांची या कामासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. विशेष पथकामध्ये १ अधीक्षक अभियंता, २ कार्यकारी अभियंते, ४ उपकार्यकारी अभियंते यांची नियुक्ती केली असून, त्यांना भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत प्रशिक्षण दिले जात आहे.
भूसंपादनाचे कामही प्रगतीपथावर
रायगड किल्ला व परिसराचा विकास करताना शिवसृष्टी, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, वाहनतळ इत्यादी कामांसाठी भूसंपादन करावे लागणार असून, त्यासाठी २१ कोटी १८ लाखांच्या रकमेस मान्यता देण्यात आली आहे. यामधील १० कोटी ५० लाख उपविभागीय अधिकारी महाड यांच्याकडे वितरीत केले आहेत.
आवश्यक असलेल्या भूसंपादनापैकी ८८ एकर क्षेत्रास शेतकऱ्यांची सहमती प्राप्त झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग महाड ते पाचाडकरिता आवश्यक १८ हेक्टर भूसंपादनासाठी एकूण खातेदारांपैकी २२८ खातेदारांची सहमती प्राप्त झाली आहे.
‘लोकमत’ने केला
होता पाठपुरावा
रायगड किल्ल्याला गतवैभव मिळावे, यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. एप्रिलमध्ये किल्ल्याच्या दुरवस्थेविषयी विशेष लेखमाला करून, येथील प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यानंतर किल्ला संवर्धनासाठी तत्काळ विशेष स्थापत्य पथकाची नियुक्ती करण्यात आली व आराखड्यातील कामे मार्गी लावण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या.
रायगड विकास आराखड्यातील प्रमुख कामे
- रायगड किल्ल्यातील सर्व प्राचीन वास्तूंचे संवर्धन
- तत्कालीन शिवकालीन पद्धतीच्या मार्गिका
-तत्कालीन पद्धतीचे सागाचे दरवाजे
- तटबंदीला पाइंटिंग व अडपिनिंग करणे
- गडावरील तलावातील गाळ काढणे
- गडावर लॅन्डस्केपिंग करणे
- पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे
- पोलीस चौकी व निवास व्यवस्था उभारणे
-राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे संवर्धन करणे
-राजमाता जिजाऊंच्या समाधीचे संवर्धन करणे
-गड व पाचाड परिसरातील पाणीपुरवठा योजना
-किल्ला व समाधी परिसरामध्ये वृक्ष लागवड करणे
- किल्ला प्रदीपन आणि ध्वनी व प्रकाश योजना राबविणे
- रायगड परिसरामध्ये देशातील सर्वात भव्य शिवसृष्टी उभारणे
- किल्ल्यावर परिक्रमा मार्ग, रज्जूमार्ग विकसित करणे
रायगड किल्ला संवर्धनासाठी
३१ मार्चपर्यंत झालेली कार्यवाही
मंजूर बाबप्रशासकीय मान्यतावितरीत निधी
किल्ल्यावरील ३ दगडी मार्गिका२१ कोटी९ कोटी
भूसंपादन२१ कोटी १८ लाख १० कोटी ५० लाख
हिवाळी अधिवेशन मागणीतून-४० कोटी
एकूण४२ कोटी १८ लाख५९ कोटी ५० लाख