जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचाच दुष्काळ
By Admin | Updated: August 31, 2016 03:28 IST2016-08-31T03:28:05+5:302016-08-31T03:28:05+5:30
रायगड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत जनसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या अलिबाग येथील रायगड जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचाच दुष्काळ
जयंत धुळप ल्ल अलिबाग
रायगड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत जनसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या अलिबाग येथील रायगड जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा (डॉक्टर्स) दुष्काळच असल्याने रुग्णांना चक्क मृत्यूलाच कवटाळून घ्यावे लागत आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे डॉक्टरांचे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. जिल्ह्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना बाह्य रुग्णसेवा देण्याकरिता अत्यंत अनिवार्य असणारे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) हे डॉक्टरांचे पद देखील रिक्त असल्याने जिल्ह्यातील या १३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील शेकडो रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आरोग्य सेवाच उपलब्ध होत नाही. जिल्हा रुग्णालयाचे सुयोग्य व्यवस्थापन राहणे अत्यावश्यक असते त्याकरिता असणारे प्रशासकीय अधिकारी हे पद देखील गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांच्या सुश्रूषा व्यवस्थापनात तसेच परिचारिका नियोजनात अत्यंत महत्त्वाचे असणारे ‘मेट्रन’हे पद गेल्या एक वर्षापासून रिक्त आहे तर ‘असिस्टंट मेट्रन’ हे पद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. सार्वजनिक आरोग्य परिचारिकांची पाच पदे या रुग्णालयात असून ही पाचही पदे गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या सुयोग्य दैनंदिन कामकाजाकरिता आवश्यक वॉर्डबॉय, आया आणि शिपाई यांची एकूण ६५ पदे आहेत, त्यापैकी ४८ पदे गेल्या तीन ते चार वर्षांपासून रिक्त आहेत.
जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ आणि जनरल सर्जन असणे अनिवार्य असताना येथे हे दोन्ही डॉक्टर्स नाहीत. बालरोग तज्ज्ञ येथे नसल्याने नवजात अर्भकांच्या समस्यांवर येथे उपचारच होऊ शकत नाहीत. अशा बाल रुग्णांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसून एकतर खाजगी रुग्णालयात जावे लागते वा मुंबईला सायन वा जे.जे. रुणालयात जावे लागते. जिल्ह्यातील महाड, माणगांव, पेण येथील उप जिल्हा रुग्णालयातील गंभीर रुग्णांना येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. सद्यस्थितीत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे येथे रुग्ण पोहोचेपर्यंतच अत्यवस्थ होतो. येथे रुग्ण पोहोचल्यावर त्यास सांगण्यात येते, ‘जिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन नाही, तुमच्या रुग्णाला मुंबईतील सरकारी रुग्णालयात घेऊन जा’ त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक अक्षरश: हबकून जातात. या परिस्थितीत अत्यवस्थ रुग्ण दगावण्याचेच प्रसंग घडले आहेत.
बाह्य रुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ डॉक्टर्स व रुग्णांना सोईस्कर होईल अशी करणे, बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) मध्ये येणाऱ्या डॉक्टर्सची येण्याची व जाण्याची वेळ, वॉर्डमध्ये व्हिजीट, त्याबाबतची बायोमेट्रिक हजेरी पध्दत अथवा तसे रजिस्टर ठेवणे, बाह्य रुग्ण (ओपीडी) विभागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करणे, केस पेपर काढताना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा निर्माण करणे, कक्षामध्ये उपस्थित डॉक्टरांचे नाव लिहिणे अशा प्रमुख मागण्या आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दिलीप जोग यांनी केल्या आहेत.
सन १९८० मध्ये बांधलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे. या इमारतीवर सुमारे १० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्याऐवजी पार्किंगसह नवीन इमारत बांधणे अधिक लाभदायक ठरले असते. वारंवार दुरुस्तीमध्ये निष्कारण आर्थिक नुकसान व अडचण होत असल्याचे जोग यांनी निदर्शनास आणून दिले.