गोंधळामुळे चर्चासत्र गुंडाळले

By Admin | Updated: September 30, 2015 00:23 IST2015-09-30T00:23:24+5:302015-09-30T00:23:24+5:30

स्मार्ट सिटी योजनेमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने आयोजित बैठकीत नेत्यांनीच दोन तास भाषणे केली.

The discussion room was closed due to confusion | गोंधळामुळे चर्चासत्र गुंडाळले

गोंधळामुळे चर्चासत्र गुंडाळले

नामदेव मोरे, नवी मुंबई
स्मार्ट सिटी योजनेमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने आयोजित बैठकीत नेत्यांनीच दोन तास भाषणे केली. एक हजार नागरिकांना बोलण्यासाठी फक्त दोन तास मिळाल्यामुळे उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सूचनांऐवजी महापालिकेवर टीका झाल्याने व गोंधळामुळे प्रशासनावर चर्चासत्र गुंडाळण्याची नामुष्की आली.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात या चर्चासत्राचे आयोजन केले होते. नवी मुंबईला स्मार्ट सिटी योजनेमध्ये प्रथम क्रमांक मिळावा यासाठी नागरिकांनी त्यांच्या संकल्पना सांगाव्या, असे आवाहन महापालिकेने केले होते. यासाठी विविध संस्था, संघटनांना पत्र दिले होते. वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या होत्या. शहरात होर्डिंग लावून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. पालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बैठकीसाठी एक हजारपेक्षा जास्त नागरिकांनी हजेरी लावली होती. परंतु चर्चासत्रामध्ये नेत्यांचीच भाषणबाजी सुरू झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. आमदार संदीप नाईक, मंदा म्हात्रे, महापौर सुधाकर सोनावणे, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी भाषणे केली. आयुक्त दिनेश वाघमारे यांचे सादरीकरण व नेत्यांची भाषणे तब्बल अडीच तास सुरू होती. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करून सभागृहातून काढता पाय घेतला. महापौरांच्या भाषणाच्यावेळीही तुमची भाषणे बास झाली. आम्ही भाषणे ऐकण्यासाठी आलो नसल्याचे स्पष्ट केले. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनीही तुमची भाषणे थांबवा, जनतेला त्यांची मते मांडू द्या, असे स्ष्ट केले.
महापालिकेने नागरिकांना त्यांची मते मांडण्यास सांगितले परंतु त्यासाठी काहीच नियोजन केले नव्हते. यामुळे नागरिक त्यांचे मत मांडता यावे यासाठी रांगा लावून उभे राहिले होते. अनेकांनी उपाय सुचविण्यापेक्षा महापालिकेच्या कामकाजावर टीकेची झोड उठविली. एक नागरिकाने तर, महापालिका स्वार्थी आहे. पहिल्यांदा सर्वांनी प्रामाणिक झाले पाहिजे. भ्रष्टाचार बंद झाला पाहिजेत असे मत व्यक्त केले. शहरात प्लास्टीक बंदी करता येत नाही. फेरीवाल्यांची समस्या गंभीर झाली आहे. अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. गावठाणांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. गावांमध्ये अग्निशमनची गाडी व रूग्णवाहिकाही जात नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मृतदेह बाहेर आणतानाही अडथळे होत असल्याचे काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. झोपडपट्टी परिसरात नागरिकांना उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. असे असताना पालिकेचा स्मार्ट सिटीमध्ये सहभाग झालाच कसा असा प्रश्नही उपस्थित केला. महापालिकेवर टीकेची झोड उठल्यामुळे अखेर प्रशासनाने ३ वाजता चर्चासत्र गुंडाळले. नागरिकांनी त्यांच्या सूचना लिखित स्वरूपात देण्याचे आवाहन केले. फक्त ३० जणांनाच बोलण्याची संधी मिळाली.
-----------
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
चर्चासत्रामध्ये काही नागरिकांनी स्मार्ट सिटीसाठी चांगल्या सूचना केल्या. परंतु बहुतांश नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली. शहरातील समस्यांवर आवाज उठविला. नेत्यांची भाषणबाजी ऐकविण्यासाठी आम्हाला बोलावले का असा जाब विचारला. फक्त दीड तास ३० नागरिकांनाच बोलण्याची संधी मिळाली. यामुळे इतरांची निराशा झाली. सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने अखेर चर्चासत्र तीन वाजताच गुंडाळण्यात आले.
-------
चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी एक हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. परंतु नागरिकांपेक्षा नेत्यांनीच अधिक वेळ भाषणे दिल्यामुळे उपस्थितांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले. पहिल्या दोन तासानंतर ७० टक्के सभागृह मोकळे झाले होते. अखेरीस मोजकेच नागरिक सभागृहात उपस्थित होेते. सर्वांना मत मांडण्याची संधी न मिळाल्यामुळे उपस्थितांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.

Web Title: The discussion room was closed due to confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.