हुतात्मा स्मारकांची दुरवस्था

By Admin | Updated: September 21, 2015 03:04 IST2015-09-21T03:04:29+5:302015-09-21T03:04:29+5:30

स्वातंत्र्य संग्रामातील चिरनेर जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके उरण परिसरात उभारण्यात आली आहेत

Disaster of Martyrdom Monuments | हुतात्मा स्मारकांची दुरवस्था

हुतात्मा स्मारकांची दुरवस्था

उरण : स्वातंत्र्य संग्रामातील चिरनेर जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके उरण परिसरात उभारण्यात आली आहेत. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र उकिरडेच बनली आहेत. त्यामुळे स्मारके आहेत मात्र स्मरण नाही अशीच खेदजनक स्थिती आहे.
स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनांतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याचवेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते. शांततामय रितीन सुरू असलेल्या जंगल सत्याग्रहात हजारो आंदोलक सहभागी झाले होते.
जंगल का कायदा तोड दिया, इंग्रज भारत छोडोचा नारा देत आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटीश पोलिसांनी निर्दयपणे बेछूट केला. या गोळीबारात आठ हुतात्मे धारातीर्थी पडले. तर अनेकजण जखमी झाले. स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंलग सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिद्ध आहे. या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या धाकू फोफेरकर, नवश्या कातकरी (चिरनेर), रामा कोळी (मोठी जुई), हसुराू घरत (खोपटे), रघुनाथ न्हावी (कोप्रोली), परशुराम पाटील (पाणदिवे), आनंदा पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरात उभारली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील या महत्त्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत रहावी यासाठी उरण परिसरात हुतात्म्यांच्या मूळगावी शासनाने स्मारके उभारली आहेत.
मात्र बहुतांश स्मारकांची अवस्था पार दयनीय झाली आहे. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्मारकांचा वापर मुतारी, शौचालय, कपडे, मासळी सुकवण्यासाठी आणि शेतीची अवजारे ठेवण्यासाठी होवू लागला आहे. त्यामुळे स्मारकाचे उकिरडे झाले आहेत. शासनाकडून नेहमीप्रमाणे देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याची बोंब मारली जाते. अशा या ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथे साजरा केला जातो. यावेळी शासनाकडून बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदनाही दिली जाते. यावेळी कार्यक्रमासाठी येणारे राजकीय पुढारी, नेते त्यांच्या राजकीय सोईप्रमाणे चिरनेर परिसरात तसेच स्मारकांच्या देखभालीसाठी निधी देण्याची आश्वासने देताता. त्यानंतर कार्यक्रमा संपताच दिलेली आश्वासने विसरून जातात. हे आता नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. २५ सप्टेंबर रोजीही चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८५ वा स्मृतीदिन साजरा केला जाणार आहे.
या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचेजिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उपस्थित राजकीय पुढारी, नेते यावर्षी कोणतही आणखी न पाळली जाणारी आश्वासने देतात. याकडेच सर्वाधिक
नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

Web Title: Disaster of Martyrdom Monuments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.